एस.टी.सेवा बंद असल्याने गरीबांची गीतांजली पी.जे.रेल्वे सुरु करण्याची गरज.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/११/२०२१
जळगाव जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन रेल्वे म्हणून ओळख असलेली गोरगरिबांची गीतांजली म्हटले तर वावगे ठरणार नाही अशी पी.जे.नॅरोगेज रेल्वे पुन्हा सुरु करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. कारण कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून ही गाडी बंद करण्यात आली आहे.
या पूर्वी ही पी.जे.रेल्वे पाचोरा, जामनेर, पाचोरा अश्या दिवसाला चार फेऱ्या करत होती. अनेक गोरगरिब, शालेय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक प्रवास करत होते. पाचोरा ते जामनेर हे तब्बल ५६ कि. मी. अंतर आहे. परंतु या रेल्वे गाडीचे प्रवास भाडे सर्वसामान्य जनतेसाठी परवडणारे होते. तसेच पाचोरा येथून मुंबई, नागपूर, भोपालकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या व पॅसेंजर गाड्यांना कनेक्टेड असल्याने ग्रामीण भागातील गरजूंना खूप फायदेशीर होती.
पाचोऱ्याहून निघाल्यानंतर वरखेडी, पिंपळगाव (हरेश्र्वर), शेंदुर्णी, पहुर, भगदारा, व जामनेर, अशी ती धावत होती. या स्थानकावरुन नियमित चार फेऱ्या सुरु होत्या. परंतु या कोरोनामुळे दोन वर्षांपासून पी.जे.रेल्वे रुळावरुन धावलेली नाही. ही पी.जे.रेल्वे केंद्र सरकारने त्वरित सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.
कारण मागील बऱ्याच दिवसापासून एस.टी.कर्मचारी संपावर उतरले असून सरकार व संपकरी एस.टी.कर्मचारी यांच्यात समझौता होत नसल्याने संप सुरुच आहे. या कारणामुळे दिवाळीच्या सणासुदीला आया-बहिणींना माहेरी जाणे व परत येण्यासाठी प्रवासाचे साधन नसल्याने बऱ्याचशा भगिनींना भाऊबीज साजरी करता आली नाही.
तसेच दैनंदिन जीवनातील अडीअडचणी व सणासुदीला काहींना प्रवास करणे गरजेचे असल्याने कधी मालवाहतूक करणाऱ्या तर कधी खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करत वेळ काढावी लागली. परंतु असा प्रवास करतांना या खाजगी प्रवासी वाहतूक करणारांनी मनमानी भाडे घेऊन गरजवंतांची आर्थिक लुट करत गुराढोरांसारखे कोंबून जीवघेणी प्रवासी वाहतूक केली. तर काहींनी दुचाकीवरून प्रवास करुन वेळेवर कामकाज पार पाडले.
परंतु असा प्रवास करतांना बरेचसे अपघात झाले या अपघातात काहींना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व आले सोबतच उपचारासाठी काहींना हजारो तर काहींना लाखो रुपये खर्च करावे लागले.जर का या एस.टी,च्या संपाच्या कालावधीत पी.जे.रेल्वे सुरु राहिली असती तर पाचोरा ते जामनेर दरम्यान असलेल्या शेकडो खेड्यातील जनतेची प्रवासाची अडचण दुर झाली असती.
परंतु सरकार कोणतेही असो जनतेच्या मतावर निवडून आल्यावर सत्ता मिळाल्यावर मात्र कारभार स्वताच्या मतावर चालवतात म्हणून लोकशाही नावालाच उरली असल्याचा भास होतो कारण जनहितार्थ निर्णय घेतले जात नाहीत.
म्हणून आतातरी ब्रिटीशकालीन पी.जे.रेल्वे (गोरगरिबांची गीतांजली) तातडीने सुरु करावी म्हणजे गरजू जनतेच्या जीवाशी खेळ होणार नाही. तसेच आर्थिक लुट न होता सुरक्षित प्रवासाची व्यवस्था होईल.
कमीत कमी प्रवास भाड्यात प्रवास करण्यासाठी पी.जे.रेल्वे त्वरीत सुरु करावी ही जनतेची जोरदार मागणी आहे.