गावागावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस पाटलांची गोलमाल भुमिका .
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०८/२०२३
सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात खेड्यापाड्यात, वाडा, वस्तीवर सगळीकडे सट्टा, पत्ता, जुगार, गावठी दारुची निर्मिती व विक्री, गांजा सारख्या मादक पदार्थांची तसेच देशी व इंग्लिश दारुची अवैध विक्री करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे हे सगळे अवैध धंदे शाळा, कॉलेज, धर्मस्थळे, पानटरी, किरणा दुकान, वर्दळीच्या ठिकाणी व वाडा, वस्तीवरील घराघरातून केले जात आहेत. यामुळे आपसूकच जागेवर हे अवैध धंदे सुरु असल्याने सगळीकडे जेष्ठ नागरिक, अल्पवयीन मुले, तसेच ज्या वयात शिक्षण घेऊन व्यायाम करुन शरीरयष्टी कमावून नोकरी किंवा उद्योगधंद्यांत उतरण्याच्या वयातील तरुणवर्गात व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
या अवैध धंद्यांमुळे आजपर्यंत बरेचसे संसार उद्धवस्त झाले आहेत व दररोज कित्येक संसार उद्धवस्त होत असून काही उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. कारण व्यसनाधीन लोक आपल्या व्यसनपूर्तीसाठी घरातील धान्य भांडीकुंडी महिलांच्या अंगावरील डाग, दागिने यात विशेष करुन माय, माऊलीच्या गळ्यातील सौभाग्याच लेण असलेले मंगळसूत्र मोडून आपली व्यसनपूर्ती करत आहेत. एवढ्यावरच नाही भागले तर घर, शेतजमीनवर कर्ज काढून किंवा खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन हा पैसा व्यसनात उडवत असल्याचे दिसून येत आहे. यातुनच व्यसनाधीन लोकांच्या कुंटुबात दररोज भांडणतंटे, महिलांना मारठोक, गल्लीबोळात भांडणतंटे, घरातील सुनांना गांजपाठ व मग पुढे घटस्फोट, आत्महत्या अश्या अनेक घटना घडत असल्याने गावागावात, घराघरात अशांतता निर्माण झाली आहे.
बऱ्याचशा गावागावातून त्रस्त महिला, सुज्ञ नागरिक व तरुणांनी तक्रार करत गावातील सट्टा, पत्ता, जुगार, दारुची विक्री हे सर्वप्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी बऱ्याच वेळा ग्रामसभेत ठराव घेतले, हे ठराव स्थानिक पोलीस स्टेशनपासून तर वरिष्ठांना पाठवले तसेच गावातील संरपंचांपासून तर मा. आमदार, मा. खासदार, मा. पालकमंत्री व संबंधितांकडे पाठवले मात्र तात्पुरती मलमपट्टी करुन पुन्हा त्याच तिकीटावर तोच खेळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. यामागील कारण जाणून घेतले असता काही गावागावातून काही सुज्ञ तरुण, नागरिक व विशेष करुन महिलांनी दिलेली माहिती अशी की आमच्या गावात जे अवैध धंदे सुरु आहेत याला आमच्या गावातील तात्या, बापू, जिभाऊ, सरपंच व पोलीस पाटील व स्वताला प्रतिष्ठीत समजून घेणारे लोक जबाबदार आहेत. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही कारण आम्ही अर्ज, फाटे केल्यावर पोलीस येतात परंतु पोलिस आल्यानंतर वरिल स्वताला प्रतिष्ठीत समजून घेणारे तसेच सरपंच व पोलीस पाटीलच कारवाईत अडथळा आणून त्यांची पाठराखण करतात यामागील कारण म्हणजे जोपर्यंत अवैध धंदे करणारे व व्यसनाधीन लोक गावात आहेत तोपर्यंत यांचे राजकारण व कामे सुरळीत होतात. अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
यामागील कारण म्हणजे निवडणुकीच्या आखाड्यात दारु पाजली जाते. तसेच गावात अवैध धंदे सुरु असले म्हणजे श्रीमंत लोकांना याचा फायदा होतो. हे श्रीमंत लोक संबंधित व्यसनाधीन लोकांना फक्त दारु पाजून व कमीत, कमी रोजंदारीवर काम करुन घेतात. मात्र या अवैध धंद्यामुळे गावागावात व्यसनाधीनता वाढत चालली आहे. अल्पवयीन मुले सुद्धा व्यसनाधीन झाले आहेत. हे व्यसनाधीन लोक गावात व घरात उपद्रवी ठरत आहेत. कारण दारु पिऊन धिंगाणा घालणे, मारामाऱ्या, खुश, तसेच आपल्या व्यसनपूर्तीसाठी घरातील संसार उपयोगी वस्तू, धन, विकून व्यसन करतात. यामुळे घराघरात भांडणतंटे होत आहेत. बरेचसे संसार उध्वस्त झाले आहेत तर काही बरबादीच्या मार्गावर आहेत. यामुळे कित्येक महिलांनी आपले घर सोडून काडीमोड घेतला आहे. तर काही महिला दररोज गांजपाठ सहन करुन मरणाला रात्र आठवी करत उपाशीपोटी राहुन मुलबाळ सांभाळत आहेत. तसेच याच कारणामुळे बऱ्याचशा महिलांनी आपले जीवन संपवून घेतले आहे.
आत्ताच झालेल्या अधिवेशनात सर्वप्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी व संपूर्ण दारुबंदी करण्यासाठी एम. पी. डी. ए. सारख्या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिली होती. तसे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र हे आदेश हवेतच विरले असल्याचा अनुभव येत असल्याने भविष्यात गावागावातून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढतील व गावागावातील घराघरांतून तसेच तरुण पिढी सट्टा, पत्ता, जुगार व दारुच्या आहारी जाऊन गावच्या, गाव बरबाद होतील अशी भिती सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली असून महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
(ज्या, ज्या गावात अवैध धंदे सुरु असतील त्या, त्या गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलीस पाटील यांनी हे अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव व पोलीस पाटील यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्वरित माहिती देऊन अवैध धंदे बंद करणे ही जबाबदारी आहे. तसेच तक्रारी आल्यानंतर कडक कारवाई करणे हे संबंधित अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. परंतु आजपर्यंत कोणीही तक्रार दाखल केली नसल्याने तसेच तक्रारी दाखल करुनही कारवाई केली जात नसल्याने हे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत हे मात्र खरे म्हणून जबाबदार पदाधिकारी व पोलीस पाटील व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्या विरोधात कारवाई का ? करण्यात येऊ नये असा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.)