जळगाव जिल्ह्यात ६ एप्रिलपर्यंत ३७ (१) व (३) कलम लागू.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/२०२१
सध्या संपुर्ण जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरु असून सदर संसर्ग रोगावर भारतात लस उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी देखील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेले आहे. त्याचे तंतोतंत पालन होण्यासाठी त्याचप्रमाणे नागरीकांनी सण,उत्सव, थोरामोठ्याच्या जयंती, पुण्यतिथी, धार्मिक दिंडी अशा स्वरुपांचे कार्यक्रम घेवु नये याकरीता प्रतिबंधात्मक आदेशाची आवश्यकता आहे.
त्याकरीता जळगाव जिल्ह्यात ३७ (१) व (३) कलमान्वये खालील कृत्यांना बंदी घालण्यात येत आहे.
शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठया किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरणे, अंग भाजुन टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे, दगड अगर इ. अस्त्र किंवा शस्त्र सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे, साधने इ. जमा करणे आणि बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्रांचे प्रतिकात्मक, प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिकरित्या ओरडणे, किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे, सभ्यता अगर नितीमता विरुध्द असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलकइ. लावणे किंवा इतर कोणतेही असे जिन्नस अगर वस्तु तयार करणे अगर त्यांचा प्रसार करणे या कृत्यांना बंदी घालीत आहे.
वरील कलम ३७ (१) अंतर्गतचा हा आदेश ज्यांना हातात लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागू असणार नाही.
त्याचप्रमाणे मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पांच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यांस सबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पुर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये बंदी घालीत आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेत यात्रा यांना लागु असणार नाही. परंतु जिल्हादंडाकारी, जळगाव यांचेकडील आदेश क्र. दंडप्र -०१/ कावि/२०२१/६०५ दि. १४ मार्च, २०२१ मधील अटी लागु राहतील. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. हा आदेश दिनांक २३ मार्च, २०२१ चे रात्री १ वाजेपासून ते दिनांक ०६ एप्रिल, २०२१ चे रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहील. असे अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.