किरकोळ कारणावरून चिंचपूरे गावात सिनेस्टाईल हाणामारीत आई व मुलगा जबर जखमी, फिर्याद दाखल नसल्याने मारेकरी अद्यापही मोकाटच.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०४/२०२४
सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व्यस्त असतांनाच याचाच फायदा घेत दुसरीकडे अवैध धंदे, गुंडागर्दी, मारामाऱ्या, दिवसाढवळ्या लुटमार, चोऱ्या अशा घटना घडत आहेत. अशीच एक घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिंचपूरे गावात दिनांक २४ एप्रिल २०२४ बुधवार रोजी सकाळी सात वाजून विस मिनिटाला घडली आहे. हि घटना पाहिल्यावर कायद्याचा धाक संपला आहे की काय अशी मनात सहज निर्माण होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चींचपूरे गावातील रहिवासी निहाल रविंद्र बेलदार हा दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी झोपेतून उठून घराच्या मागच्या दरवाजाने घराबाहेर गेला असता त्याला पाहून शेजारीच रहाणार वसंत ओंकार बेलदार हा निहाल याच्या घरासमोर पडलेल्या रेतीने रहदारीला अडथळा येतो म्हणून शिवीगाळ करायला लागला तेव्हा रेती आमच्याच घरासमोर पडली आहे तु आम्हाला का शिवीगाळ करतो अशी विचारणा निहाल याने वसंत बेलदार याला केली. तेव्हा वसंत बेलदार याने हा रस्ता तुझ्या बापाचा आहे का असे बोलून वाद घातला हे भांडण ऐकून वसंत पवार याची मुले रावसाहेब, विजय, वसंत पवार याची पत्नी राधाबाई व मुलगी आशाबाई विनोद बेलदार हे सर्व घराबाहेर येऊन निहाल व त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करु लागले.
ही शाब्दिक चकमक वाढत जाऊन शाब्दिक भांडणाचे रुपांतर हाणामारीत होऊन वसंत बेलदार, राधाबाई बेलदार, रावसाहेब बेलदार, विनोद बेलदार यांनी हातात लाकडे, काठ्या व इतर वस्तू घेऊन निहालाच्या घराकडे धाव घेऊन जीवे मारण्याची धमकी देत निहाल व त्याची आई सौ. सुनिता रविंद्र बेलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला तेव्हा रावसाहेब व वसंत यांच्या हातामध्ये खिळे असलेले लाकुड (ताफा), विजयच्या हातात लोखंडी पाईप सारखी वस्तू, जयेश याच्या हातात विळा तर आशाबाई हिच्या हातात छोटा चाकू लपवलेला होता.
या हल्ल्यात आशाबाई हिने सौ. सुनिता बेलदार यांच्या पोटात चाकु मारण्याचा प्रयत्न केला मात तो चाकू पोटात न लागता हाताला लागला तसेच हल्लेखोरांनी निहाल याच्यावर हल्ला करत बेदम मारहाण केली यात निहालाच्या डोक्यात जबर मार लागून त्याचे डोके फुटल्यामुळे तो जागेवर बेशुद्ध पडला तरीही हल्लेखोर निहाल याला मारतच होते. यावेळी निहालच्या आईने निहालला वाचवण्यासाठी प्रयत्न केला या प्रयत्नात त्यांच्या डोक्यात विटा, दगड व लाकडाचा मार लागल्याने त्याही बेशुद्ध पडल्या तरीही हल्लेखोरांनी मारणे सुरुच ठेवले यात निहालची बहिण सुचिता ही लाही मार ठोक करण्यात आली. हे भांडण पाहून गल्लीत राहणारे राजेंद्र किशन कुमावत, गणेश प्रकाश पाटील व इतर ग्रामस्थांनी भांडण सोडवले अन्यथा या भांडणात एखाद्याचा जीव गेला असता अशी माहिती समोर येत असून दुसऱ्या गटातील काही व्यक्ती जखमी झाले असल्याने तेही वैद्यकीय उपचार घेत आहेत.
या हाणामारीच्या भांडणात सौ. सुनिता बेलदार यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तुटून हरवले व मोबाईल फुटला असून दोघ हाताला, डोक्यावर तसेच इतर ठिकाणी मार लागला आहे. तसेच निहाल बेलदार याच्या डोक्यावर जबर मार लागल्याने त्याच्या डोक्याला दहा टाके पडले असून हातापायाला व अंगावर मुका मार लागून जबर जखमी झाला आहे. तर सौ. सुनिता बेलदार यांच्या उजव्या हाताला चाकू लागल्याने आठ टाके पडले असून दोघंही हाताला अस्थिभंग झाला होऊन डोळ्याला, छाती, पाठीवर शरीरावर मुका मार लागल्याने जबर दुखापत झाली आहे.
सदरची घटना घडल्यानंतर निहाल बेलदार व सौ. सुनिता बेलदार यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला जाऊन आपली आपबिती सांगितली व फिर्याद घेण्यासाठी सांगितले होते तेव्हा दोघांनाही जबर मारहाण झाली असल्याचे व रक्तस्राव होत असल्याचे पाहून अगोदर उपचार घेणे गरजेचे असल्याकारणाने त्यांना उपचारासाठी अगोदर पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालय, नंतर पाचोरा येथे पाठविण्यात आले होते मात्र गंभीर दुखापत असल्याचे पाहून त्यांना तातडीने जळगाव पाठवण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून जखमींची प्रकृती स्थिर झाल्यावर रितसर गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे जखमी निहाल याने सांगितले आहे.
हे भांडण झाल्यापासून मारेकरी गावात मोकाटच फिरत असल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे. तसेच मारेकरी अजूनही पाहून घेऊ अशी भाषा वापरत असल्यामुळे पिडीत कुटुंबीयांच्या जीवितास धोका होऊ शकतो म्हणून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.