वडगाव आंबे ग्रामपंचायतीकडून समस्या सुटत नसल्याने येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जैन परिवाराकडून मतदानावर बहिष्कार,
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०४/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील रहिवासी दिलीप फुलचंद जैन यांनी वडगाव आंबे येथील ग्रामपंचायतीकडे त्यांच्या अडीअडचणी वारंवार सांगूनही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या अडचणी व पाहिजे त्या नागरी सुविधा मिळत नसल्याने सरतेशेवटी स्वता दिलीप जैन व सौ. सुरेखा जैन हे येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार याबाबतचे निवेदन दिनांक २२ एप्रिल २०२४ सोमवार रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब जळगाव, मा. प्रांताधिकारी साहेब व मा. तहसीलदार साहेब पाचोरा यांच्याकडे पाठवणार आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिलीप जैन यांचे वडिलोपार्जित घर हे गावाच्या मध्यभागी आहे. परंतु मागील दहा वर्षांपासून गावात अतिक्रमण वाढले आहे. यामुळे गावात घरापर्यंत जाण्यायेण्यासाठी सुरक्षित रस्ता नाही. याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ग्रामसभेत व मासिक मीटिंगमध्ये वारंवार सांगूनही घरापर्यंत असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात नाही. विशेष म्हणजे वडगाव आंबे गावचा सन १९६९ मध्ये सी. टी. सर्व्हे झालेला आहे तरीही ग्रामपंचायत हलगर्जीपणा करत आहे.
तसेच दिलीप जैन यांच्या घराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मा. श्री. वसंतराव चव्हाण यांच्या दुकानाजवळ ग्रामपंचायतीने सांडपाण्याच्या गटारीवर सिमेंट काँक्रीटचा ढापा बनवला आहे मात्र हा ढापा बनवतांना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली गेली नसल्याने हा ढापा प्रमाणापेक्षा उंच झाल्यामुळे या ढाप्या वरुन दुचाकी व चारचाकी तर सोडाच साधे पायी चालणे धोकादायक झाले आहे. याबाबत वारंवार सांगूनही आजपर्यंत माजी व आजी सरपंचांनी करुन घेऊ, पाहून घेऊ अशी आश्वासने दिली परंतु आजपर्यंत मा. वसंतराव चव्हाण तसेच मा. अनिल हिलाल शिंदे यांच्या घराकडील रस्त्यावर सुरळीतपणे वाहन चालवता येईल अशी सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही.
विशेष म्हणजे संपूर्ण गावातच अतिक्रमणामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच दिलीप जैन हे दिव्यांग असल्याकारणाने दैनंदिन कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी व घरी येण्यासाठी दुसऱ्याच्या मदतीने चारचाकी किंवा दुचाकीवरून जावे व यावे लागते परंतु रस्ता सुरक्षीत नसल्याने दैनंदिन कामात व वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात जाण्यासाठी अडथळा येत असल्याने या सुविधा मिळवून घेण्यासाठी आता सरतेशेवटी दिलीप जैन व सौ. सुरेखा जैन यांनी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.