प्रशासक व ग्रामसेवकांना वाटत नाही लाज आणी लज्जा, ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांचा उडवला फज्जा. अंबे वडगाव येथील संतप्त झालेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/१०/२०२३

पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथे दिनांक ३१ ऑगस्ट गुरुवार रोजी विस्तार अधिकारी राजेंद्र धस साहेब व ग्रामसेवक म्हस्के यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली परंतु ग्रामसभेत ग्रामस्थांनी मांडलेल्या अनेक समस्यां सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने एक महिना उलटला तरीही कोणत्याही प्रकारची तसदी घेतली नसल्याने ग्रामसभेत घेण्यात आलेले ठराव म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. तसेच ज्यांनी मागील पाच वर्षे ग्रामपंचायतीच्या खुर्चा तोडल्या त्यांनी तर आम्ही या गावचे नाहीत अशी भूमिका घेतली असली तरी मात्र आता पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून माजी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत.

३१ ऑगस्ट रोजी प्रशासक धस साहेब व ग्रामसेवक म्हस्के यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या ग्रामसभेत मागील दोन वर्षांपासून बसवलेले ॲक्वा फिल्टर त्वरित सुरु करुन ग्रामस्थांना पाण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध करुन देणे, गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. म्हणून त्वरित स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. महिलांच्या शौचालयाचा प्रश्न महत्त्वाचा असून शौचालयाची व्यवस्था करणे, मागील काळात स्मशानभूमी जवळ बांधण्यात आलेल्या शौचालयांच्या जवळील अतिक्रमण काढून त्यांची दुरुस्ती, लाईट व पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणे. कुऱ्हाड रस्त्यावर असलेल्या जुन्या शौचालयांची दुरुस्ती करणे तसेच नवीन बांधलेली शौचालये का पाडण्यात आली याचा खुलासा देणे, तसेच जर ती शौचालये खाजगी जागेत बांधण्यात आली होती म्हणून ती पाडली असतील तर मगा तेव्हा संबंधित सत्ताधारी व ग्रामसेवक यांनी खाजगी जागेत शौचालये का बांधली म्हणून त्यांच्याकडून शौचालये बांधण्यासाठी वापरला गेलेला निधी वसुल करणे. गावाचा सिटीसर्हे सर्हे झालेला असून त्याप्रमाणे गावातील वाढते अतिक्रमण काढणे गावातील सट्टा, दारु कायमस्वरूपी बंद करणे, बसस्थानक व मराठी मुलांच्या शाळेजवळ असलेले अतिक्रमण काढून शाळेच्या स्वरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, गावातील गावठी डुकरांचा शंभर टक्के कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कडक कारवाई करणे, भररस्त्यावर सुरु असलेली मांस विक्री कायमस्वरूपी बंद करुन दुसरीकडे मांस विक्री करण्यासाठी सुचना देणे. सततचे होणारे भारनियमन बंद करण्यासाठी ठराव करुन विद्युत वितरण कंपनीला देणे. यावर्षी पावसाळा कमी होणार असल्याचे संकेत आहेत तसेच आपल्या कोकडी (म्हसळा) धरणात जलसाठा नाही परंतु काही शेतकरी पाणी उचलून शेततळे व विहीरी भरण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे म्हणून पाणी उचल (चोरी) होणार नाही अशी व्यवस्था करणे व पाणी चोरी करणारांवर कडक कारवाई करण्यासाठी ठराव मंजूर करणे. गावात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने गावात धुळ फवारणी करावी कारण डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत पिण्याच्या पाण्याचे दररोज शुध्दीकरण करुन पाणी सोडणे. पी. सी. के. कॉटन जिनींग फॅक्टरीला मुख्य जलवाहिनी वरुन दिलेले नळ कनेक्शन त्वरित बंद करणे इत्यादी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली परंतु या ग्रामसभेत विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची गैरहजेरी असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.


ग्रामसभा घेण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी ज्या समस्या मांडल्या होत्या त्या लवकरच सोडवण्यात येतील असे आश्वासन प्रशासकीय अधिकारी मा. धस साहेब व ग्रामसेवक म्हस्के यांनी दिले होते. यानुसार ग्रामस्थांना वाटत होते की आज नाहीतर उद्या कामाला सुरुवात होईल मात्र ३१ ऑगस्ट पासून आज दिनांक ०८ ऑक्टोंबर उजाडला तरीही ग्रामसभेत मांडण्यात आलेल्या समस्यांपैकी एकही समस्या सोडवण्यात आलेली नाही. मांडलेल्या समस्यांपैकी महत्वाची समस्या म्हणजे गावात गावठी डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून गावात माता, भगिनींना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गावाजवळ असलेल्या शेतामध्ये मका व कापूस पिकाचे डुकरे नुकसान करीत आहेत. याबाबत मा. धस साहेब व ग्रामसेवक म्हस्के यांना वारंवार भेटून तसेच भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी विनंती केली जात आहे. मात्र संबंधित अधिकारी व ग्रामसेवक कोणत्याही प्रकारची तसदी घेत नसल्याने ग्रामस्थ व शेतकरी हैराण झाले आहेत.

यावरुन एकच लक्षात येते की “प्रशासक व ग्रामसेवकांना वाटत नाही लाज आणी लज्जा, ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांचा उडवला फज्जा”

येत्या दोन दिवसात गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त न झाल्यास मा. प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याची सुचना वडगाव आंबे गावातील महिला व ग्रामस्थांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या