वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत झालेल्या राजकीय मंथनातून, आज मुख्यमंत्र्यांच्या श्रीमुखात अमृतवाणी होण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०७/२०२३
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत राजकीय घडामोडींवर वैचारिक मंथन सुरु होते. या वैचारिक मंथनातून महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात नेमकं काय घडणार ? याचा अजिबातही अंदाज बांधता येणार नाही. कारण, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली असून अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.
अजित पवारांच्या घुसखोरीमुळे शिंदे गटातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार करावा, अशी मागणी आमदारांकडून केली जात आहे, अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत गुप्त बैठक झाली. यावेळी तिन्ही बड्या नेत्यांमध्ये तब्बल ३ गुप्त बैठकी झाल्या. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet expansion) चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
याशिवाय कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं द्यावं ? याबाबत सुद्धा विचारविमर्श करण्यात आल्याचं समजतंय. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटासह भाजपच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे, त्यातच अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास एकनाथ शिंदे यांच्या गटाचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक देखील पार पडली होती.
या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात यश आल्याची माहिती समोर आली होती. अजित पवार यांच्याकडून निधी देण्यास दुजाभाव होणार नाही, असं आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री तिन्ही बड्या नेत्यांची बैठक पार पडली. तब्बल ३ तास सुरू असलेल्या या बैठकीत उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. येत्या एक ते दोन दिवसात शिवसेना, भाजपमधील आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यानंतर तिन्ही पक्षात समान खातेवाटप होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मोठी घोषणा करू शकतात अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.