कष्ट करून पिकत नाही, पिकलं त विकत नाही, विकलं तर पदरात काहीच पडत नाही, तरी माझा बाप शेती का करतोय ? संतोष पाटील.
दिनांक~२५/०६/२०२३
*कष्ट करून पिकत नाही*
*पिकलं त विकत नाही*
*विकलं तर पदरात काहीच पडत नाही*
*तरी माझा बाप शेती का करतोय?*
संतोष पाटील
———————————————
गेल्या वर्षी पिकवलेला माल विकला गेला नाही उत्पन्नाचा ताळमेळ बसला नाही, शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठांचे भाव वाढले त्या पटीत उत्पन्न आले नाही आपल्या संसारीक गरजाही पूर्ण झाल्या नाहीत, गळ्यापर्यंत आलेलं कर्ज अधिकच वाढत गेलं सावकारीचा गळ्याभोवती लागलेला फास अधिकच आवळला गेला, इतकं सगळं झालं शेतकरी तोट्यात केला शेती परवडत नाही तरीही माझा बाप शेती का करतोय? या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार माझा बाप करत नाही का? हे माझ्या बापाला कळत नाही का? माझा बाप वेडा आहे का ? तर याचं उत्तर येतं नाही, *माझा बाप बाप आहे या जगाचा पोशिंदा आहे या जगातील तमाम जनतेचे पोट भरलं पाहिजे एवढाच विचार करून माझा बाप शेती करतोय* नुकत्याच व्यालेल्या म्हशीचं पारडू काही कारणानं मरून जातं मग ती म्हैस दूध देत नाही, त्यावेळेस त्या म्हशीचा पालक त्या मेलेल्या पारडूच्या पोटात भुसा भरून म्हसी पुढे उभा करतो मग ती म्हैस त्या भुसा भरलेल्या आपल्या लेकराला पिलाला आपल्या जिभेने चाटून दूध द्यायला सुरुवात करते, खरं म्हणजे आपलं पिल्लू मेलेले आहे हे त्या म्हशीला माहीत असतं पण त्याचं भुसा भरलेला सांगाडा पाहून तिच्या मनामध्ये त्याच्या तीव्र आठवणी येतात आणि त्या आठवणीत पाहणा हळूहळू मोकळा होतो आणि ती दूध द्यायला सुरुवात करते, हे सर्व त्या म्हशीला आणि त्या शेतकऱ्याला ही माहीत असतं मात्र दूध काढण्यासाठी नाईलाज असतो, अशीच अवस्था माझ्या शेतकरी बापाची झालेली आहे त्याला हे सगळं कळतंय शेती परवडत नाही उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च वाढलेला आहे शेतीच्या मालाला कुठलाच शाश्वत असा हमी भाव नाही, अस्मानी सुलतानी चे संकट अशा अनेक गोष्टी त्याला कळत आहेत पण तरीही या जगात पोट भरण्यासाठी आपण समाजाचं देणं लागतो आपल्याला शेती केलीच पाहिजे ही जाणीव त्याच्या मनामध्ये सतत असते म्हणून तो शेती करतो, मित्रहो यावर्षीचा विचार केला तर सगळ्याच शेती पिकांना भाव मिळाला नाही ते विकले गेले नाही, आता जून महिना सरत आला तरी घरामध्ये कापूस पडून आहे दुसऱ्या पेरणीचा मौसम हुकत चालला तरी अजून बऱ्याच ठिकाणी पेरण्या झालेल्या नाही, काही ठिकाणी पेरण्या झाल्या मात्र पाऊस पडत नाही आधीच बियाणं घ्यायला पैसे नाही त्यात दुबार पेरणीच संकट या शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलेलं आहे, या देशातील सगळेच लोक शेतकऱ्याला लुटण्यासाठी बसलेले आहेत, मजुरी पासून ते कृषी केंद्र, एपीएमसी, प्रायव्हेट व्यापारी, सावकार, बँका, या सर्वांनी या शेतकऱ्याला जगू द्यायचा नाही असा चंग बांधलेला दिसतोय, हे सरकार या सरकारा तील कृषी मंत्रालय, कृषी विभाग, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचार करत नाही स्वतःला जनतेचे सेवक म्हणून घेणाऱ्या पुढार्यांना तर वेळच नाही, अतिशय बिकट अशी परिस्थिती आज रोजी माझ्या शेतकरी बापाची झालेली आहे गेल्या वर्षाचा माल विकला गेला नाही देणेकऱ्याचं देणं व्याजासकट दुप्पट झालं, आता या वर्षाची शेती करायला पैसा नाही बँकेकडून घेतलेल्या कर्ज एनपीए झालं तेही भरायला पैसे नाहीत आणि दुसऱ्या बँकेत जायचं तर सिबिलची अट कर्ज मिळू देत नाही (त्यात काही सन्माननीय बँकाचा अपवाद सोडून)
सावकाराचे आधीच देणं झालं नाही तर कुठल्या तोंडाने त्याच्याकडे पुढचं कर्ज घ्यायला जायचं हेच कळत नाही, या देशातील अनेक कल्याणकारी योजना भ्रष्टाचारानं गिळंकृत केलेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या नावानं पुढारी आणि अधिकारी स्वतःचे पोट भरून घेत आहेत सगळ्या योजना कागदावरच्या कागदावर राहतात, शेवटच्या वाफेला पाणी मिळत नाही तसं शेतकऱ्यांच्या हातात काहीच येत नाही, अशा परिस्थितीतही माझा शेतकरी बाप या जगाचा पोट भरण्यासाठी इथल्या लेकरा बाळांना पोटभर अन्न खाऊ घालण्यासाठी पेरणीची तयारी करून बसला आहे, मात्र पाऊस पडत नाही म्हणून त्याची पेरणी थांबलेली आहे शेतकऱ्यांची व्यथा सर्वश्रूत असली तरी या विषयावर कोणीच बोलत नाही कोणाच्याच तोडून शब्द फुटत नाही, राजकीय, सामाजिक, शासकीय, हे सर्व लोक इतके असंवेदनशील झाले आहेत की त्यांना या शेतकरी वर्गाचं काहीच घेणं देणं नाही, अशा परिस्थितीमध्ये उधळी लागलेल्या खुंटासारखा उभा असलेल्या माझ्या बापाचा मला सार्थ अभिमान वाटतो की माझ्या बापाचा जन्म फक्त देण्यासाठी झालेला आहे घेण्यासाठी नाही, पिकत नाही परवडत नाही ही सबब न सांगता माझा बाप न परवडणारी शेती ही आनंदाने करतोय होय माझा बाप शेती करतोय, शेती करतोय…
संतोष पाटील
७६६६४४७११२