शेतकऱ्याची कसली दिवाळी साहेब,आता दिवाळ निघालय . मायबाप सरकार आत्महत्या केल्यावर आमच्या मढ्यावर रडाल का ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=१५/११/२०२०
पाचोरा तालुक्यातील विद्यूतवितरण कंपनीचे अनेक प्रताब उघड येत असतांनाच भोजे येथील एका शेतकरी बांधवाने विद्यूतवितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला वैतागून सोशल मीडियावर लिहिलेले पत्र सत्यजित न्यूजच्या हाती लागले ते जसेच्या तसे आपल्यासाठी
शेतकऱ्यांचे पत्र
आज दुनिया दिवाळी साजरी करत असताना आम्ही शेतकरी मात्र मागच्या तीन महिन्यापासून अंधारात आहोत. वरील फोटो हा भोजे शिवारातील (पिंपळगाव सबस्टेशनमधील) आमच्या कृषी ट्रान्सफॉर्मर चा आहे.
शेतकऱ्यांसाठी आपलं शेत म्हणजेच घर अन दार असतं अन जगाच्या पोशिंदा म्हणवल्या जाणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात म्हणजे घरात मागच्या तीन महिन्यापासून लाईट नाही. पहिले दोन महिने फक्त दोन तारांमध्ये वीज होती, मोटारी चालल्या नाही नंतर ट्रान्सफॉर्मर खराब झाला, शेतकऱ्यांनी अनेक विनवण्या केल्यावर महावितरण खात्याने येथील DP नवीन आणण्यासाठी गाडी आणली पण शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा केली, जुना ट्रान्सफॉर्मर काढून नेला १५ दिवस झाले पण अजूनही ट्रान्सफॉर्मर आणला नाही.
महावितरण विभाग टाळाटाळ करण्यासाठी वीजबिल भरण्याचे उदाहरण देतो, साहेब आज इतर विभागात सारे शेतकरी वीजबिल न भरता आणि अनेक ठिकाणी लोकं अवैध वीज मस्तपणे वापरत असतांना आम्हालाच हा सवाल का ?
विजय मल्ल्या, निरव मोदी, सनी कालरा यांसारख्या २८ लोकांनी भारताचे तब्बल १० ट्रीलियन रुपये(१००००००००००००₹) लुटले आणि ज्या शेतकऱ्याकडे तुम्ही दहा रुपयाच्या भाजीचा भाव करता त्या गरीब शेतकऱ्यावर काय राग काढता साहेब ?
आमच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला असता तर आम्ही बिल काय तुम्हाला कर्ज दिलं असतं हो, पण तुम्ही सर्व गोष्टींचा भाव वाढवला फक्त शेतमाल सोडून(माहिती आणि सर्व संदर्भांसकट बोलतोय)
सत्ता कुठलीही असो शेतकऱ्याचे हाल नक्की आहेत हे कळून चुकलं #तालुक्याला आप्पा निवडून आले म्हणून काही बदल होईल असं वाटलं होतं पण कोणाला काही घेणं देणं नाही कारण सगळ्या मोठ्या माणसांच्या-साहेबांच्या घरांत, कारखान्यांत लाईट कधीच जात नसते ना हो, लाईट जाते ती फक्त शेतकऱ्यांच्या वावरात
(दुर्दैव)
साहेब आगामी काही दिवसांत आमच्यातला कोणी शेतकरी आत्महत्या करून मेला तर सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार या काळ्या आईच्या शपथेसह
राम राम
भोजे शिवारातला एक
त्रस्त शेतकरी