शेतकऱ्यांसह पाचोरा शहरातील नागरीकांच्या समस्यां सोडविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा “दणका मोर्चा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०६/२०२३
शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसह पाचोरा शहरातील नागरीकांच्या समस्यां सोडविण्यासाठी दिनांक १९ जून २०२३ सोमवार रोजी सकाळी १० वाजता भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातर्फे “दणका मोर्चा” काढण्यात येणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच पाचोरा शहरातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी कागदपत्रांसह जास्तीत, जास्त संख्येने उपस्थित राहून मोर्चात सामील व्हावे असे आवाहन राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. सचिन सोमवंशी व शहराध्यक्ष ॲड. मा.अमजद पठाण यांनी केले आहे.
सद्यस्थितीत भाजपचे व बंडखोर आमदारांचे महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठलेले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्यातच शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला हमीभाव किंवा योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस मातीमोल भावाने विक्री करावा लागतो आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस टिकवण्यासाठी केलेला खर्चही हातत न आल्यामुळे आज शेतकऱ्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे व यातुनच दररोज शेतकरी आत्महत्या करत असल्याचा घटना घडत आहेत.
तसेच उन्हाळ्यात कधी नव्हे इतके उच्च तापमान होते या उच्च तापमानात केळी, मोसंबी, लिंबू इत्यादी फळबागांचे नुकसान झाले आहे. तसेच जून महिन्यात रविवार दिनांक ०४ जून २०२३ रोजी झालेल्या वादळवाऱ्यासह पावसात केळी, मोसंबी, लिंबू ही फळझाडे मोठ्या प्रमाणात उन्मळून पडली असून झाडावरील फळे सत्तर टक्के गळून पडली आहेत. या फळपीकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही करण्यात आलेले नाहीत. काही प्रमाणात पंचनामे करण्यात आले परंतु ते झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन करण्यात आलेले नाहीत व अद्यापपर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाईची रक्कम जाहीर करण्यात आलेली नसल्याने फळबाग शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
तसेच पाचोरा शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून यात विद्युत वितरण कंपनीने कोणतेही कारण नसतांना व विद्युत ग्राहकांच्या कोणत्याही प्रकारची तक्रार नसतांना पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागातील विद्युत ग्राहकांच्या घरातील विज मिटर काढून ते इलेक्ट्रीक पोलवर बसवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत तरी हा प्रकार त्वरित थाबवण्यात यावा, बाहेरपुरा भागातील सांडपाण्याच्या भुयारी गटारींचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, बाहेरपुरा भागातील हिंदू स्मशानभूमीच्या लगत असलेल्या भुखंडावर पेव्हर ब्लॉक बसवून पार्कींग झोन तयार करण्यात यावा, पाचोरा शहरातील विविध भागातील विविध समस्या त्वरित सोडविण्यात याव्मायात, नेरी येथील फरशी पुलाचे काम त्वरित करण्यात यावे अश्या विविध मागण्या बाहेरपुरा भागातील रहिवाशांनी केल्या आहेत.
विशेष म्हणजे पाचोरा शहरासह पाचोरा तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांनी गोरखधंदा सुरु केला असून सगळीकडे मनमानी कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे. रेशनिंग दुकानांच्या समोर कोणताही माहिती फलक, सुचना फलक किंवा धान्याचा स्टॉक बोर्ड तसेच भाव फलक व रेशनिंग वाटपाचे प्रमाण व नियमावली फलक जनहितार्थ लावण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्या महिन्याचे धान्य वाटप करण्यात येत आहे याची कोणतीही माहिती दिली जात नाही, ई पॉश मशिनवर अंगठा घेतल्यानंतर जी पावती दिली जाते ती अस्पष्ट रुपात असते किंवा कागद शिल्लक नसल्याचे सांगत पावती दिली जात नाही. रेशनकार्ड वर नावे असलेले युनिट व शासनाने ठरवून दिलेल्या धान्यांचे प्रमाणात घोळ करण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बऱ्याचशा लोकांना नवीन रेशनकार्ड बनवणे, रेशनकार्ड विभक्त करणे, रेशनकार्डवरील नावे कमी करणे, नवीन नावांचा समावेश करणे, सण २०२२ ते सण २०२३ या कालावधीत रेशनिंग दुकानातून वाटप करण्यात आलेल्या मोफत व विकत धान्याची चौकशी व्हावी, अश्या विविध समस्यांवर आवाज उठवण्यासाठी उद्या पाचोरा तालुक्यातील तसेच शहरातील नागरिकांनी कागदपत्रांसह जास्तीत, जास्त संख्येने दणका मोर्च्यात सामील व्हावे असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. सचिन सोमवंशी व शहराध्यक्ष ॲड. मा. अमजद पठाण यांनी केले आहे.