इंडिया की मोहब्बत चाय मे, आज आंतरराष्ट्रीय चहा दिन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०५/२०२३
आपल्याकडेच नाही, तर जगभरात सगळीकडेच चहा हे पेय नाही तर ती एक संस्कृती आहे. माणसामाणसांना जोडून घेणारी, गरम पाण्याच्या त्या एका उबदार पेल्यात जीवनाचा प्रवाह वाहता ठेवणारी संस्कृती. संवाद सुरू करून देणारी, अडलेला संवाद पुढे नेणारी, असलेला संवाद आणखी पुढे नेणारी संस्कृती. एका अर्थानं त्या एका लहानशा पेल्याने जग व्यापलंय, जग जोडलंय, कधी काळी तोडलंय सुद्धा अश्या या चहाबद्दल आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त संग्रहित केलेली थोडक्यात माहिती आपल्यासमोर. कारण चहा हे पेय चमत्कार घडवणारे पेय आहे आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान हेही चहा विकायचे असे बोलले जाते तर आजही गाव, खेड्यातील, वाडा, वस्तीवर ठिकठिकाणी चहाची टपरी व चांगली दुकाने सुरु आहेत. अश्या या चहाने अनेकांच्या भाकरीचा प्रश्न सुटला आहे तर संपूर्ण जग या चहाच्या प्रेमात पडल असून सगळ्यांचे प्रेम अबाधित राखण्यासाठी आजच्या युगातील अमृततुल्य समजले जाणारे चहा हे एकमेव पेय आहे.
आज आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त संग्रहित केलेली माहिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
चहाचा शोध :
चहा हे ब्रिटिशांचं पेय मानलं जात असलं तरी तसं नाही. त्याचं मूळ प्राचीन चीनशी जोडलं जातं. असं सांगितलं जातं की ख्रिस्तपूर्व ३० वं शतक ते ख्रिस्तपूर्व २१ वं शतक या काळात कधीतरी चीनमध्ये चहाचा शोध लागला. ख्रिस्तपूर्व २७३७ मध्ये शेन नुंग हा तेव्हाचा सम्राट सत्तेवरून हाकलला गेला. त्याला दक्षिण चीनच्या दुर्गम भागात एकांतवासात ठेवलं गेलं. तो अतिशय कफल्लक अवस्थेत होता. एकदा तो एका झाडाखाली बसून गरम पाणी पीत असताना त्याच्या कपातील गरम पाण्यात त्या झाडाची काही पानं पडली. त्यामुळे पाण्याचा रंग बदलला, चवही बदलली. सम्राटाला त्या पाण्यामुळे एकदम तरतरी आली. त्याला ती चवही इतकी आवडली की त्या काळात त्याने गरम पाण्यात ती पाने घालून ते पाणी प्यायचा सपाटाच लावला. त्याने त्या परिसरात म्हणजे सिचुआन आणि युनानच्या डोंगररांगांच्या त्या परिसरात चहाच्या रोपांचा शोध घेतला. सातत्याने चहा प्यायल्याने त्याचा पोटदुखीचा आजार बरा झाला असा प्रचार करत तो देशभर फिरू लागला. त्यातून आजच्या चहाचा जन्म झाला असं मानलं जातं.
दुसऱ्या एका कथेनुसार चहाचा शोध साधारण ख्रिस्तपूर्व १५०० ते १०४६ लागला. चीनमध्ये शेंग राजघराण्याने औषधी पेय म्हणून चहा वापरायला सुरुवात केली आणि चहाचा शोध लागला.
चहाचे फायदे :
१. केस चमकदार राहतात
ग्रीन टीच्या वापराने केस चमकदार बनू शकतात. ग्रीन टीसुद्धा त्याच झाडांपासून बनवली जाते ज्यापासून काळा चहा बनवला जातो. मात्र ग्रीन टी बनवण्याची पद्धत वेगळी असते. ग्रीन टीला ऑक्सिडाइज केलं जात नाही. त्यामुळे पानांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. ते इलेक्ट्रॉन केसांना चमकवण्यास मदत करतात.
असा करा वापर
केस चमकदार बनवण्यासाठी, ग्रीन टीची तीन बॅग उकळत्या पाण्यात टाका. पाणी थंड झाल्यावर टी बॅग काढून घ्या आणि त्या पाण्याने केस धुवून घ्या. १० मिनिटानतंर केसांना कंडीशनर लावा. त्यानंतर केसांना येणारी चमक पाहण्यासारखी असते. तुम्ही केसांना गडदसुद्धा करू शकता, त्यासाठी ग्रीन टीऐवजी ब्लॅक टीचा वापर करावा.
२. डोळ्यांना बनवा सुंदर
जर तुमचे डोळे सुजले असतील तर काळजीचं कारण नाही. वापलेले दोन टी बॅग तुमची समस्या दूर करू शकतात. तणाव, अॅलर्जी, जास्त दारू पिल्याने डोळ्यांना सूज येऊ शकते. मात्र, चहात असलेली कॅफीन सुजलेल्या डोळ्यांच्या नसा आणि स्किनला आराम देतात आणि तुमचे सूजलेले डोळे ठीक होतात.
असा करा वापर
डोळे बंद करून टी बॅग डोळ्यांवर १० मिनिटं ठेवा. त्यानंतर तुम्हाला झालेला बदल जाणवेल.
३. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी
जेव्हा तुम्ही जास्त वेळ सूर्य प्रकाशात राहता, तेव्हा चेहऱ्यावर काळे डाग येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी थंड टी बॅग चेहऱ्यावर प्रभावित जागी १० मिनिट ठेवावी. त्यानंतर झालेला बदल तुम्हाला दिसेल.
४. गुलाबाच्या फुलांची सुंदरता वाढवा
चहाच्या पानांमध्ये आढळणारा टॅनिक अॅसिड गुलाबाच्या फुलाची सुंदरता आणि रंग वाढवण्यास मदत करतो. वापरलेल्या टी बॅग फाडून गुलाबाच्या झाडाच्या मुळाशी पसरवावी. त्याचा परिणाम फुलांवर होऊन फुले अधिक सुंदर होतात.
५. इंजेक्शनचं दुखनं कमी करण्यासाठी
जर तुमची स्किन थोडी कडक असेल तर इंजेक्शन घेण्यापूर्वी इंजेक्शन घेण्याच्या जागी थंड टी बॅग ठेवा. काही वेळाने स्किन मऊ होईल. त्यामुळे इंजेक्शनचा त्रासही होणार नाही आणि कोणतही इन्फेक्शन होण्याची भीतीही राहणार नाही.
६. पायांना बनवा सुंदर
जर दिवसभर काम करून तुमच्या पायांना दुर्गंधी येत असेल किंवा स्किनची समस्या असेल तर काळजी करण्याची गरज नाही. महाग स्प्रे खरेदी करण्यावर पैसे खर्च करण्याची गरज नाही.
असा करा वापर
कोमट पाण्यात टी बॅग टाका. पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये पाय भिजवा. त्यामुळे पायांची दुर्गंधी तर जाईलच, त्याचबरोबर पायदेखील मऊ होतील.
७. मुरूम आणि पुटकुळ्यांना द्या सुट्टी
चेहऱ्यावरील डाग, मुरूम यांपासून सुटका मिळवण्यासाठी ग्रीन टीचा वापर होऊ शकतो. ग्रीन टी स्किनमध्ये असलेले बेन्जॉईल प्रॉक्साइडला थांबवते, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या येत नाहीत.
चहाचे तोटे :
१. दिवसाला ७ ते ३० कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.
२. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.
३. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.
४. टपरीवर चहा ॲल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. ॲल्युमिनियमच्या संपर्कात जास्त वेळ आल्यावर ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
५. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही. हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे, हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.
६. चहाचे सेवन अधिक केल्यास दातांवर डाग येतात.
७. रात्री उशिरा चहा प्यायल्यास निद्रानाशचा त्रास संभवतो.
८. दिवसभरात तीनहून अधिक वेळा चहा प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
पण काही लोक चहाचे खूप चाहते आहेत, त्यासाठी चहा कसा, कधी प्यावा याबाबत मात्र वेगवेगळी मते आहेत.