आधी बाप मारला आणि आता, त्याच्या तेरवीसाठी दहा हजारांची मदत. संतोष पाटील.
दिनांक~२०/०५/२०२३
आधी बाप मारला आणि आता, त्याच्या तेरवीसाठी दहा हजारांची मदत. संतोष पाटील.
—————————————————-
आजच्या दिव्य मराठी (छत्रपती संभाजीनगर १८ हे २०२३) पेपरमध्ये एक बातमी वाचनात आली, त्या बातमीचे शीर्षक असे आहे, “दहा हजारांच्या आर्थिक साह्याने शेतकरी आत्महत्या होणार कमी” बातमी पुढील प्रमाणे मराठवाड्यात विभागीय प्रशासनातर्फे २१ लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. पाच लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून झाले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे विभागीय आयुक्त सरकारकडे एकरी दहा हजार रुपये मदतीची शिफारस करणार आहे. या शिफारसीचा सर्वच शेतकरी संघटनांना आनंद झालेला आहे हे ऐकून वाचून मलाही आनंद झाला.
मात्र या ठिकाणी एक प्रश्न उभा राहतो की खरेच दहा हजाराच्या मदतीने शेतकऱ्यांची आत्महत्या थांबेल का ? दुसरी गोष्ट लाखो रुपयाचा शेतीमाल घरामध्ये पडून आहे, आणि हा शेतकरी लाखो रुपयांचं घेतलेल्या कर्जाचे व्याज भरत आहे. दुसऱ्या पेरणीची वेळ येऊन गेली तरी शेतकऱ्यांच्या घरातला कापूस, सोयाबीन, तूर, मका विकला गेलेला नाही. आणि या एकरी दहा हजाराच्या मदतीने खरेच शेतकऱ्यांचे भले होणार आहे का ? विशेष म्हणजे ही फक्त शिफारस केलेली आहे अजून हातात काहीच पडलेले नाही तरीही शेतकरी संघटनेतील लोक खुश आहेत. या शिफारशीचे ते स्वागत करत आहेत.
शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्याच निविष्ठांच्या किंमती या शेतकरी विरोधी सरकारातील लोकांनी वाढवून ठेवलेल्या आहेत, मग आधी लाखो रुपयांनी लुटून आता काही हजारांची मदत देण्याची शिफारस म्हणजे काय “आधी बाप मारला आणि आता त्याच्या तेरवीसाठी हे आर्थिक मदत करणार आहे” शेतकरी मित्रहो ही आपली प्रचंड अशी चेष्टा चाललेली आहे. तरीही आपल्याला राग येत नाही, काहीच समजत नाही, शेतकरी विरोधी कायद्यांचा आधार घेत व्यापारांच्या दबावला बळी पडत या सरकारने खरीप रब्बी हंगामातील सर्व शेती पिकांचे भाव निम्म्यावर आणले, शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना नुसत्या कागदावर ठेवल्या आणि राजकारण करून शेतकरी हित दूर सारून तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं, असे हे घाणेरडे विचारांचं सरकार तितकेच कारणीभूत असलेले शेतकरी नेते, न्युज पेपर, टीव्ही चॅनल्स, या सर्व लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
माझा भोळा भाबडा शेतकरी कसा नाडला जातो, कधी बांधावर तर कधी बाजारात भर दिवसा लुटला जातो, या देशामध्ये कुणीच शेतकऱ्याचा वाली राहिलेला नाही राजकीय पुढार्यांकडून तर अपेक्षा संपलेलीच आहे. मात्र स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणारे राजकीय पक्षांचे दलाल (काही सन्माननीय अपवाद वगळून) शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला कारणीभूत आहेत. खरे शेतीचे प्रश्न काय आहेत या ए. सी. मधे बसलेल्या लोकांना काय कळणार, कोण शिफारस करतो कोण अभ्यास करतो आणि खरंच हे सरकार या शिफारशी मान्य करेल काय ? या सगळ्या गोष्टी मनाला पटणार नाही.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उधळी लागलेल्या खुंटासारखा या शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे उभे करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे, (त्याला आधी पूर्ण कर्जमुक्त केलं पाहिजे) त्याच्या नंतर जल, वीज, बीज, या गोष्टी त्याला वेळेवर आणि मुबलक प्रमाणे मिळाल्या पाहिजे आणि त्यांनी पिकवलेलं पीक आहे योग्य दरात खरेदी केलं पाहिजे तेव्हाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येतील अन्यथा हे सगळं व्यर्थ आहे.
संतोष पाटील.
७६६६४४७११२