विद्युत वितरण कंपनीची मनमानी, बळीराजाच्या डोळ्यात पाणी. कळमसरा शिवारातील हिरवीगार पिके नष्ट होण्याच्या मार्गावर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथून जवळच असलेल्या आंबाडी शिवारातील भोई नावाने ओळखली जाणारी (डीपी) ट्रांसफार्मर मागील पंचवीस दिवसापासून नादुरुस्त झालेला आहे. या ट्रांसफार्मरवर अधिकृत विद्युत ग्राहक असलेल्या शेतकऱ्यांनी सक्तीने बिल वसुलीच्या वेळी तीस हजार रुपये बिल भरले होते. तेव्हा त्यांचा ट्रांसफार्मर सुरू करण्यात आला होता. परंतु काही दिवसातच हा ट्रांसफार्मर जळाल्याने मागील २५ दिवसांपासून आंबाडी शिवारातील भोई नावाने ओळखल्या जाणाऱ्या ट्रांसफार्मरचा विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने या शिवारातील मका, गहू, दादर, हरभरा, पपई, टरबूज ही पिके बऱ्याच प्रमाणात सुकली असून बाकीची पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. पिके सुकू नयेत म्हणून ट्रांसफार्मर त्वरित बदलून मिळावा याकरिता शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीचे शेंदुर्णी येथील कनिष्ठ अभियंता मा.श्री. सुनील चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिले भरण्यासाठी सक्ती केली व बिले भरल्यावर ट्रांसफार्मर दिला जाईल अशी अट घातली होती. या अटीनुसार या ट्रान्सफॉर्मर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी उधार, उसनवारी करुन पै, पै जमवून ९० हजार रुपये जमा करून मागील पंचवीस दिवसापूर्वी भरले आहेत.
मात्र बिल भरल्यावरहु २५ दिवसाचा कालावधी उलटल्यार सुद्धा आज पर्यंत ट्रांसफार्मर न देता उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने कळमसरा येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांना लवकर ट्रांसफार्मर मिळावा म्हणून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सौ. वंदनाताई पाटील यांनी कनिष्ठ अभियंत्या पासून तर वरिष्ठांपर्यंत भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सुद्धा हे मगरुर अधिकारी फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांना सतावत आहेत. या विद्युत वितरण अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांनी राबराब राबून रात्रंदिवस मेहनत करुन जोपासलेली पिके हातची वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून आता शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
तसेच कळमसरा गावासाठी नियुक्त असलेला लाईनमन व विद्युत सहाय्यक या गावाला कधी दिसत नसून या गावाचा विद्यूतपुरवठा झिरो वायरमनच्या भरवशावर चालत असतो. तसेच मध्येच काही तांत्रिक बिघाड झाल्यास तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी संबंधित कर्मचाऱ्याकडून पैशाची मागणी केली जाते व पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही असे त्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. तरी येत्या दोन दिवसात ट्रांसफार्मर बदलून न मिळाल्यास शेतकरी तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
सताड उघडी पेटी म्हणजे मौत का कुवा
(कळमसरा अंबाडी शिवाय म्हणजे मालखेडा व कळमसरा राखीव जंगलाच्या मध्यभागी असलेले शेत शिवार आहे. त्यामुळे या जंगलातील रानडुक्कर, निलगायी यांची संख्या जास्त असल्याने ही जंगली जनावरे पिकांची नासाडी करतात. तसेच विद्यूत वितरण कंपनीकडून कधी रात्री तर कधी दिवसा विद्यूत पुरवठा होत असल्याने साप, विंचू यासह जंगलातील प्राण्यांचा सामना करत पिकांना पाणी भरावे लागते आहे. तसेच याच शिवारात मागील महिन्यापासून बिबट्या फिरत असल्याने शेतकऱ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. म्हणून शासनाने लवकरात, लवकर शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित मगरुर अधिकाऱ्यांना समज द्यावी अशी मागणी केली जात आहे.)