दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०२/२०२२
*गानसम्राज्ञी*
सरताज गेला स्वरसाज गेला
गानकोकीळेचा गोड
आवाज गेला.
कोण गायील आता
ताण पिकस्वर मंजुळेची
जगा वेगळा एक अंदाज गेला.
ग्रह थांबले नक्षत्र थांबले
सुर्य चंद्र अन् तारे थांबले
पर्वत नद्या आवाक झाल्या
घोंगावणारे वारे थांबले.
सात सागरांचा झरा आटला
खंड-खंडांना हुंदका दाटला.
पोरका झाला ब्रम्हनाद
दाही दिशांत काळोख दाटला
झाड झाड मुके
पान पान सुके
क्षितीजा वरच्या इंद्रधनूचे
सात रंगही फिके फिके.
झाली दिशाभूल अन्
रस्ता चुकली धरा…
मैफिलीच्या तारांगणातून
एक निखळला तारा.
सप्तसुरांचे येथे राहिले
बोल अविट हे एकसुरे
नश्वर जगती शाश्वत घडले..
मृत्यूलोकीचे तत्व खरे
तुणतुण्याची किणकिण सरली
ढोलकीची खणखण नुरली
चाळे मधली छमछम
आणि डफानेही चुप्पी धरली.
सप्तस्वरांनी श्वास रोखले
तबल्याच्या ऱ्हदयाचे ठोके चुकले.
लय तालच्या सरी थांबल्या..
मेघांचे पखवाज थकले..
चराचराने मान टाकली
शेवंती(आई)ची वेल(लता) सुकली.
दीनानाथाचा भार वाहाता
शारदेची विणा थकली..
पर्व संपले युगं संपतील
कथेल काळ पुढे पुढे
एक अजूबा असा जाहला
लता दिदींच्या स्वरा मुळे….
कवी –
अरुणाग्रज (शिंदाडकर)
9527161626
📕✒️🙏🐜🌳🕊️