राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येचा जामनेर तालुका वकील संघाकडून निषेध.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०१/२०२४
सद्यस्थितीत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचे जाणवते आहे. कारण मागील दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत डॉक्टर, पत्रकार, लोकप्रतिनिधी, ज्यांच्या खांद्यावर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची महत्वाची जबाबदारी आहे अश्या महत्वाच्या पोलीस विभागातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर दिवसाढवळ्या जीवघेणे
हल्ले होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नसून न्याय मंदिरात काम करणारा वकील वर्गही आता या गुंडागर्दीचे शिकार होत असून आता या गुंडागर्दी करणारांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
याचेच जीवंत उदाहरण म्हणजे राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येमुळे संपूर्ण वकिली क्षेत्रात खळबळ माजली असून या घटनेस जबाबदार असणाऱ्या व अटक केलेल्या आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वरील घटनेचा निषेध नोंदवत जामनेर तालुका वकील संघाकडून तहसिलदार~नानासाहेब आगळे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका येथील न्यायालयात प्रॅक्टिस करणारे आढाव वकील दाम्पत्य यांचे पक्षकाराने त्यांचे अपहरण करून हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण न्यायालयीन क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. सदर घटनेचा संपूर्ण राज्यभरातून न्यायालयीन क्षेत्रातून तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला जात आहे. याच विषयाला अनुसरून जामनेर तालुका वकील संघाकडून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला जामनेरचे तहसिलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की वकिली क्षेत्रात काम करणाऱ्या वकिलांवर अश्याप्रकारे होणारे हल्ले ही चिंतेची बाब असून संपूर्ण न्याय व्यवस्थेसाठी ही चिंताजनक बाब असल्याचे म्हटले आहे. आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येमुळे वकिली क्षेत्रात काम करणाऱ्या वकील बांधवांकडून सदर घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला जात असून अश्या स्वरूपाची घटना पुन्हा घडू नये यासाठी न्यायालयाकडून आरोपींवर कठोर स्वरूपाच्या कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जामनेर तालुका वकील संघाकडून आढाव वकील दाम्पत्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.निवेदन देतेवेळी वकील संघाचे अध्यक्ष बी. एम. चौधरी, सचिव महेंद्र बी. पाटील, ए. डी. सारस्वत, कृतिका पाटील, रुपाली चव्हाण, समाधान डी. जाधव, आय. बी. भुसारी, बी. एस. पवार, आर. बी. शेख, आर. पी. चोपडे, डी. पी. बोरसे, पी. के. पाटील, ए. बी. परदेशी, आर. बी. सुरवळकर, एस. वाय. सुरवाडे, एस. के. पाटील, के. पी. बारी, एस. एस. पंडित यासह असंख्य वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.