वडगाव आंबे ते कुऱ्हाड रस्त्याच्या कामात खोडा, संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याने ठेकेदार हतबल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०१/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे ते कुऱ्हाड या अंदाजे सहा किलोमीटर लांबीचे डांबरीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित ठेकेदाराने मागील महिन्यापासून कुऱ्हाड गावाकडून ते वडगाव आंबे पर्यंतच्या रस्त्याचे अंदाजे चार किलोमीटर अंतराचे डांबरीकरण पूर्ण केले आहे. हे काम करतांना उत्कृष्टरित्या काम होत असल्याने आसपासच्या खेड्यापाड्यातील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. कारण हा वडगाव आंबे ते कुऱ्हाड रस्ता पूर्ण झाल्यास पिंपळगाव हरेश्वर, कोल्हे, पिंप्री, डांभुर्णी, वडगाव आंबे व इतर आसपासच्या गावातील ग्रामस्थांना जळगाव येथे जाण्यासाठी कमी टप्पा पार करावा लागणार असल्याने वेळ व इंधनखर्चात बचत होऊन कामे जलदगतीने होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
परंतु या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असतांनाच वडगाव आंबे गावापूरता काही अंतरावरच एका शेतकऱ्याने या रस्त्याचे काम थांबले असून शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार हा रस्ता शेतातून जात असल्याने माझ्या शेतजमिनीचे नुकसान होणार आहे असे म्हटले आहे. मात्र याच रस्त्यावरून मागील पन्नास वर्षांपासून वहिवाट सुरु असून आजपर्यंत या रस्त्यावरुन वावरतांना कुणीही व कुणालाही आडकाठी घातली नाही मग आत्ताच का असा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत योग्य तोडगा काढून हा रस्ता त्वरित पुर्ण करण्यात यावा अशी मागणी कुऱ्हाड, वडगाव आंबे व आसपासच्या परिसरातील गावागावातून केली जात असल्याचे दिसून येते.
तसेच हा रस्ता होतांना ज्या शेतकऱ्यांने कामात अडथळा आणला आहे त्याचे म्हणणे ऐकून घेत प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन संबंधित शेतकरी जर विनाकारण रस्त्याच्या कामात अडथळा आणत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे. मात्र यात काही लोक स्वतःचा येतो साध्य करण्यासाठी झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका पार पाडत असल्याने या रस्त्याच्या कामात अजूनच अडथळा निर्माण होत आहे तरी संबंधित विभागाचे अधिकारी यांनी त्वरित योग्य निर्णय किंवा योग्य कारवाई करून हा रस्ता त्वरित पूर्ण करावा अशी मागणी होत आहे.