आदिवासी भिल्ल असल्याचा शाप, नवजात बालकासाठी रडत आहेत आई आणि बाप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/११/२०२३
डॉक्टर म्हटल म्हणजे आव्हानात्मक निदान करुन, रुग्णांना विध्वंसक आजारांना सामोरे जाण्यास आणि त्यावर मात करण्यास मदत करणे आणि प्रिय व्यक्ती गमावल्यानंतर कुटुंबियांना सांत्वन करणारा देव माणूस असे असले तरी सद्यस्थितीत (सगळेच नाही) बरेचसे डॉक्टर आपले कर्तव्य विसरुन फक्त आणि फक्त पैसा कमावण्याच्या नादात लागले असल्याने सद्यस्थितीत सर्वसामान्य जनतेला वैद्यकीय क्षेत्रात दररोज नवनवीन घटनांना सामोरे जावे लागत आहे. अशीच एक घटना काल दिनांक १४ नोव्हेंबरच्या रात्री पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील एका वृंदावन हॉस्पिटलमध्ये घडली असल्याचे खात्रीलायक वृत्त ऐकावयास येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरातील भगगाव रोडवरील एका नामांकित डॉक्टरांच्या दवाखान्यात एक आदिवासी भिल्ल समाजातील भडगाव येथील १५ दिवसाचे बाळ दुपारच्यावेळी वृंदावन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होते. परंतु संबंधित कुटुंब हे आदिवासी भिल्ल समाजातील असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याकारणाने अंगावरील वेशभूषा पाहून संबंधित कुटुंबातील नातेवाईकांना दवाखान्यातील कर्मचारी व सहकारी वर्गाने विचारपूस करण्यात तसेच बाहेरुन लागणारा औषधी व इतर खर्च करु शकतात का या चौकशीच्या फेऱ्यात अडकवून धरत ठेवले तसेच डॉक्टरांनी वेळेवर तपासणी व उपचार न केल्यामुळे बाळ दगावल्याचे असल्याचे सांगितले जात आहे.
अशातच नातेवाईकांच्या विनवण्या व आग्रह केल्यानंतर डॉक्टरांनी रात्री उशिराने का होईना रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास नवजात १५ दिवसीय बालकाची तपासणी करुन उपचार सुरु केले मात्र दुपारपासून उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्या बालकावर उशिराने तपासणी व घाईघाईने उपचार करण्यात आल्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला होता तरीही संबंधित डॉक्टरांनी आपली चुक झाकण्यासाठी मृत बालकाला घाईघाईने कापडात गुंडाळून तडकाफडकी पुढील उपचारासाठी जळगाव किंवा पाचोरा सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठीचा सल्ला दिला होता असे सांगीतले जात आहे.
हा प्रकार घडल्यानंतर संबंधित आदिवासी भिल्ल कुटुंबीयांनी मृत बालकाला घेऊन पाचोरा येथील नगरपरिषदेच्या दवाखान्यात धाव घेतली होती. तसेच पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु त्यांना योग्य मदत व मार्गदर्शन मिळाले नसल्याने तसेच परिस्थितीने हतबल झालेले आदिवासी भिल्ल कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत पाचोरा शहरात रात्रभर संघर्ष करत होते. तसेच रात्री उशिरा पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.