पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है. पाचोरा तालुक्यातील बोगस खत विक्रेत्यांवर कारवाई कधी ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०७/२०२३
(पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील हर्षिता कृषी केंद्र, भोजे येथील व कुऱ्हाड येथील विजय कृषी केंद्राच्या माध्यमातून सरदार कंपनीच्या सुपर फॉस्फेट या बोगस खतांची विक्री करण्यात आली आहे. मात्र संबंधित खत विक्री करणाऱ्या कृषी केंद्राच्या संचालकांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई किंवा शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून योग्य त्या कलमान्वये गुन्हा नोंद करणे गरजेचे असतांनाही संबंधित कृषी केद्रांना एक प्रकारे अभय देण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे असून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत संतप्त भावना व्यक्त करत या प्रकरणी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे.)
भोजे येथील कृषी केंद्राच्या संचालकांनी खत विक्रीच्या पावत्या हिसकावून घेतल्याची शेतकऱ्यांची तक्रार.
*************************************************************
पाचोरा तालुक्यातील भोजे येथील कृषी केंद्रातून सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आले होते. परंतु जेव्हा हे खत बोगस निघाल्याची बोंबाबोंब झाली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भोजे येथील ज्या कृषी केंद्रातून सरदार कंपनीचे खत विकत घेतले होते त्यांना जाब विचारण्यासाठी कोल्हे व इतर गावांतील शेतकरी गेले असता संबंधित कृषी विभागाच्या संचालकांनी काही शेतकऱ्यांशी गोड बोलून तर काही शेतकऱ्यांच्या हातातून खत विक्री झाल्याच्या पावत्या हिसकावून घेतल्याच्या तक्रारी समोर येत असून काही जवळच्या शेतकऱ्यांना पावत्या दिल्याच नसल्याने आमच्याजवळ कोणताही पुरावा नसल्यामुळे आम्ही आमच्या नुकसान झालेल्या कापूस पिकाची तक्रार व पंचनामे कोणत्या पुराव्यानिशी करावे अशी विचारणा फसगत झालेल्या शेतकऱ्यांनी सत्यजित न्यूज कडे कली आहे.
“पाचोरा कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची भुमिका संशयास्पद”
**************************************************************
पाचोरा तालुक्यातील बोगस खत विक्रेते व तालुक्याचे जबाबदार कृषी अधिकारी व कर्मचारी यांची मिलीभगत असल्याचा आरोप फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी केला असून जामनेर व पाचोरा तालुक्यातील बोगस खत विक्री, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची (आम्ही मारल्यासारखे करु, तुम्ही रडल्या सारखे करा) अशी दिसून येत असल्याकारणाने संबंधित अधिकाऱ्यांची भुमिका संशयास्पद असल्याचा ठपका नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ठेवला आहे.
***********************************************************
जामनेर व पाचोरा तालुक्यातील कृषी केंद्राच्या मालकांनी बनावट रासायनिक खते विकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मोयखेडा दिगर, तोरनाळा, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, तोंडापूर अशा १२ गावातील २९५ शेतकऱ्यांनी बनावट खताबाबत तक्रारी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. तसेच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, भोजे, कुऱ्हाड व इतर गावातील कृषी केंद्रातून सरदार कंपनीच्या सुपर फॉस्फेट या बोगस खताची विक्री करण्यात आली असून पाचोरा तालुक्यातील जवळपास आठ ते दहा गावातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेकडो एकरावरील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. त्या अनुषंघाने कृषी व संबंधित विभागाने कारवाई करून माल उत्पादन व वितरण करणाऱ्या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले जात आहे.
या बोगस खत प्रकरणी पावसाळी अधिवेशनात जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत नामदार मा. श्री. गिरीश भाऊ महाजन यांनी या विषयावर आवाज उठवला होता. याची दखल घेत शासनाच्या वतीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकाच्या अधिकाऱ्यांनी जामनेर तालुक्यातील कृषी केंद्राची तपासणी व पाहणी करुन तसेच दुकानातील खतांचे नमुने घेऊन ते पुढील तपासासाठी यावल तालुक्यातील पाल येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत तसेच या कारवाईत पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील विजय कृषी केंद्राचा खत विक्री परवाना निलंबित करण्यात आला आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार गुजरातमधील राजकोट येथील सरदार ॲग्रो फर्टिलायझर अँड केमिकल्स या उत्पादक कंपनीचे तीन भागीदार तसेच पार्श्वनाथ ॲग्रो टेक (कानळदा रोड, जळगाव), अभिषेक कृषी केंद्र (मोयखेडा, ता. जामनेर), धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र (तोरनाळा, ता. जामनेर) व बालाजी ट्रेडर्स (तोंडापूर, ता. जामनेर ) या कृषी केंद्राचे पाच भागीदार, मालक अशा एकूण ८ जणांविरोधात जळगाव येथील जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी विजय दगू पवार यांच्या फिर्यादीवरून काल रात्री उशिरा जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे करत आहेत. दरम्यान, सिंगल सुपर फॉस्फेट या रासायनिक खतांचे उत्पादन, वितरण व विक्री केल्यामुळे तालुक्यातील जवळपास ४२३ हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याच बोगस खताची विक्री पाचोरा तालुक्यातील लोहारा, कुऱ्हाड, पिंपळगाव हरेश्वर व इतर गावातील कृषी केंद्राच्या माध्यमातून करण्यात आली असून या बोगस खतांमुळे पाचोरा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे क्षेत्र बाधित झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सतत बोंबाबोंब करुनही पाचोरा कृषी विभागामार्फत पाहिजे तशी ठोस कारवाई न करता फक्त आणि फक्त कुऱ्हाड येथील कृषी केंद्राचा खत विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु या कारवाईबाबत शेतकरी वर्ग समाधानी नाही कारण शेतकऱ्यांच्या मते आमचे या बोगस खतांमुळे आमचा झालेल्या नुकसानीची नव्हे तर येणाऱ्या उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई मिळावी याकरिता बोगस खत विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
(क्रमशः ~ बोगस खत प्रकरण उघडकीस आल्यापासून बरेचसे कृषी केंद्राचे संचालक दिसेनासे झाले आहेत. म्हणून याबाबत सविस्तर माहिती जाणून घेत पुढील भागात “टांगा पलटी, घोडे फरार” या शीर्षकाखाली सविस्तर वृत्त.)