एच. आय. व्ही. बाधित आहात चिंता नको, बिनधास्तपणे करा लग्न सुशील गायकवाड यांचे आवाहन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०५/२०२३
एच. आय. व्ही. हा शब्दच कानावर पडला तर भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. कारण एच. आय. व्ही. म्हटल्यावर नको ते गैरसमज, नको त्या शंका व यातुनच निर्माण होनारी निराशाजनक मानसिकता या गोष्टी कारणीभूत आहेत कारण एच. आय. व्ही. हा आजार असाध्य असून याच्यावर अजूनही लस किंवा कोणतेही औषध उपलब्ध नाही हे जरी खरे असले तरी मात्र आता घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. आता आधुनिक व प्रगतीशील युगात दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होत असून याचाच एक भाग म्हणून एच. आय. व्ही. आजारावर नियंत्रण मिळवायला शास्त्रज्ञांना यश आले आहे. असे असले तरी आजाराबद्दल अपूर्ण माहिती असणे, समाजात आपली बदनामी होईल या भितीने किंवा अनेक शंका, कुशंका मनात घेत बरेचसे एच. आय. व्ही. आजाराने त्रस्त तरुण, तरुणी मनाने खचून जात पॉझिटिव्ह लोकांना माहीत पडेल या भितीने लग्नासाठी पुढे येत नाहीत.
परंतु अश्या एच. आय. व्ही. बाधित तरुण, तरुणींसाठी नाशिक येथील एक ध्येयवेडा समाजसेवक सुशील गायकवाड यांनी “पॉझिटिव्ह पिपल्स फाउंडेशन” नावाची संस्था स्थापन करुन त्यांच्या आयुष्यातील अडीअडचणी दुर करण्यासाठी एक सुंदर असा उपक्रम हाती घेऊन एच. आय. व्ही. बाधितांच्या आयुष्यात एक आशेचा किरण घेऊन आले आहेत. सुशील गायकवाड यांनी या अगोदरही “पॉझिटिव्ह पिपल्स फाउंडेशनच्या” माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांसाठी विविध सेवाभावी उपक्रम राबविले असून यापैकी सर्वात स्तुत्य उपक्रम म्हणजे वधु, वर सूचक मेळावा म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण ज्या एच, आय, व्ही. बाधितांच्या आयुष्यात पुन्हा आनंद बहरुन येण्यासाठी त्यांनी जवळपास २०० हुन अधिक जोडप्यांची लग्न लावली आहेत.
पाॅझीटीव्ह पिपल्स फाऊंडेशन’ संस्थेचे ‘सुशिल गायकवाड सर हे समाजसेवेचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून सन २०१३ पासून एच. आय. व्ही. बाधितांसाठी काम करत आहेत. त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून बिड, नाशिक येथे नुकतेच विधवा व अनाथ महिलांना मोफत साड्या वाटप करुन या महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत खचून न जाता नव्याने संसार कसा उभा करता येईल याविषयी विचार जाणून घेत इच्छूक महिलांनी पुन्हा लग्न करुन नव्या उमेदीने जीवन जगावे असे सांगून त्यांना आधार दिला. सोबतच काही विधवा व अनाथ मुला, मुलींची लग्न जुळवण्यात आली.
तसेच सतत मानसिक तणावाखाली राहणाऱ्या मुला व मुलींना आधार देत उमेदीने जगण्यासाठी पर्याय सुचवले व त्यांच्या मनातील भिती दुर खरत आत्महत्या करणे हा प्रर्याय नसून योग्य मार्गदर्शन करुन जगण्यासाठी सल्ला दिला. तसेच मुंबई मालाडमध्ये नुकताच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घडलेल्या घटनेतील वित्तहानी झालेल्या निराधार दहा महिलांना दोन साड्या व महिनाभर पुरेल असा किराणा दिला.
लग्न म्हणजे एक पवित्र बंधन असून गोड, अतुट असे सात जन्माचे गुंफण आहे. लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील नवी सुरुवात हा क्षण एच. आय. व्ही. बाधितांच्या आयुष्यात यावा याकरिता पॉझिटिव्ह पिपल्स फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे येथे भव्य वधुवर सुचक मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात एच. आय. व्ही. बाधित व्यक्ती लग्न केल्यानंतर निरोगी बाळाला जन्म देऊ शकते व यासाठी आमची संस्था योग्य ते मार्गदर्शन करते हे पटवून दिल्यावर या मेळाव्याला भरभरून प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने तरुण, तरुणांनी सहभाग नोंदविला होता.
अश्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर काम करत आहोत असे सांगून समाजातील मान्यवर मंडळी, राजकीय पदाधिकारी व दानशूर लोकांनी आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना उराशी बाळगून आमच्या संस्थेला फुल नाही तर फुलांच्या पाकळीच्या स्वरूपात मदत करेल असे आवाहन सुशील गायकवाड यांनी केले असून इच्छुक दात्यांनी पॉझिटिव्ह पीपल फाउंडेशन ८००७७७०२०२ व ९५०३८४४६६६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.