नंदी दुध व पाणी पितो म्हणून जळगाव जिल्ह्यात सगळीकडे महादेव मंदिरात तोबा गर्दी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक ~०५/०३/२०२२
सूचना ~ या विषयावर बातमी लिहितांना आम्ही फक्त जनजागृती हा हेतू डोळ्यासमोर ठेवून बातमी लिहीत आहे. कारण श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा वाढीस लागू नये हा यामागचा हेतू आहे. गैरसमज नसावा.
पत्थर का तो नाग बनाया, पूजे सब नर, नारी
असली नाग जब निकला, तो दंडा लेके मारी.
अनाडी ते दुनिया, प्रभुजी कैसे तरीयो.
आज दुपारपासून जळगाव जिल्ह्यात नंदी दुध व पाणी पितो आहे. आपणही आपल्या गावातील भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन नंदीला दुध पाजावे म्हणजे तुमच्या जीवनाचे सार्थक होईल असा संदेश व्हिडिओच्या प्रात्यक्षिकासह एकमेकांना पाठवून मंदिरात जाऊन नंदीला दुध पाजण्यासाठी सांगितले जात आहे.
असा संदेश काही तासांतच जळगाव जिल्ह्यातील गावागावातच नव्हे तर घराघरात व कानोकानी झपाट्याने पसरवला गेला. मग काय आम्ही सगळे शिकले, सवरले, अंतराळात रहाण्याची स्वप्न रंगवणारी व मोबाईलच्या माध्यमातून गुगलवर जगातील सर्व माहिती काही क्षणात आत्मसात करणारे ज्ञानी भक्तगण घरातील नव्हे तर शेजारच्या लोकांकडून व दुध डेअरीला जाऊन दुध घेऊन थेट नंदी जवळ पोहचलो व चमच्याने दुध, पाणी पाजून आपण धन्य झालो असे मनोमन समजून आनंदी चेहेऱ्याने घराकडे परत येतांना जो भेटेल त्याला तुम्हीही मंदीरात जाऊन या तुमचीही इच्छा पूर्ण होईल असे सांगत घराकडे जातांना दिसत होते.
हे घडत असतांनाच पाचोरा तालुक्यातील शंभरावर खेड्यापाड्यातील फोन सत्यजित न्यूजला येत होते. साहेब हा दैवी चमत्कार आहे आम्ही नंदीला दुध पाजतो तुम्ही या व्हिडिओ काढा व आमची बातमी लावा यासाठी आग्रह धरत होते. मात्र मंदिरात जातांना दुध नेण्याची ऐपत नसल्याने आपण खाली हात गेलो तर लोक नाव ठेवतील म्हणून आम्ही वृत्तसंकलन करण्याचे टाळले. (समजदार को इशारा काफी.)
परंतु मागील काही वर्षांपूर्वी आपल्या राज्यात गणपती दुध पितो म्हणून असाच गोंधळ उडाला होता. परंतु नंतर तज्ञ मंडळीने शास्त्रीय कारणे सांगून हा चमत्कार नसल्याचे पटवून दिले आहे. तरीही आज पुन्हा नंदी दुध व पाणी पित असल्याने त्या विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत आम्ही काही जानकार तज्ञ मंडळींना भेटून मत जाणून घेतले असता त्यांनी तसा खुलासा दिला असून आपल्या समाजातील गैरसमज दुर करण्यासाठी थोर विचारवंत, समाजसुधारक, संत, महंतांनी अशा घटनांचे स्पष्टीकरण देत हा चमत्कार वैगरे काही नसल्याचे पटवून दिले आहे. तसेच श्रध्दा असावी परंतु भावनांच्या आहारी जाऊन अंधश्रध्दा वाढीस लागुनये म्हणून भजन, किर्तन, सत्संग व प्रवचनाव्दारे जनजागृती करण्याचे काम केले आहे.
आजच्या या घटनेबद्दल आम्ही कॉंग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष मा.श्री.सचिन दादा सोमवंशी, प्रा. बी.एन.पाटील. सर, कुऱ्हाड येथील लोकमतचे प्रतिनिधी मा.श्री.सुनील लोहार यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
(याविषयावर अजून कुणालाही आपले मत नोंदवायचे असल्यास मोबाईल आडवा धरुन आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात ९९७५६६६५२१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठवा योग्य विचारांची दखल घेतली जाईल व सत्यजित शहा माध्यमातून प्रसारित केल्या जातील.)
*सरफेस टेन्शन मुळे पाणी घेतले जाते,नंदीला बदनाम करु नका* -महाराष्ट्र अंनिसचे भाविकांना आवाहन .
पूर्ण भारतभर आज नंदी, महादेवाची मूर्ती ,कासव हे पाणी पिताना चा चमत्कार सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे .आणि मंदिरात भाविक रांगलावत पाणी पाजण्याचा चमत्काराचा अनुभव घेताना आढळून येत आहेत .कोणतीही निर्जीव वस्तू पाणी पीत नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. नंदीची मूर्ती पाणी खेचते ते केवळ पृष्टीय ताण किंवा सरफेस टेन्शन या वैज्ञानिक तत्वामुळे. समान गुणधर्म असलेले द्रवपदार्थ जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा पदार्थाच्या थेंबाच्या वरच्या बाजूला अनुरेणू चा असलेला पृष्टीय थर हा दुसरा त्याच गुणधर्माचा थेंबाला स्पर्श केला असता खेचला जातो .मूर्ती स्वतः पाणी खेचते असते ती एका थेंबाच्या रूपात असते आणि नवीन पाण्याचा चमचा ज्या वेळेस त्या पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श केला जातो त्यावेळेस ते पाणी खेचले जाते. याला विज्ञानाच्या भाषेत सरफेस टेन्शन किंवा पृष्टीय ताण असे म्हटले जाते .यामागे कोणत्याही प्रकारचा चमत्कार नसून भाविकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
मनोजकुमार कडू महाले-पाटील
तालुकाध्यक्ष – जामनेर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.