कुरंगी ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक नसल्याने, पदाधिकारी लागले वसुलीला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०३/२०२३
खेडयाकडे चला’ ही ग्रामीण लोक जीवनाशी निगडित असलेली एक अभिनव चळवळ आहे. ही चळवळ इ. स. १९१६ मध्ये सुरुवात झाली असून राष्ट्रपिता महात्मा गांधी या संंकल्पनेचे प्रणेते मानले जातात.
खऱ्या भारताचे दर्शन खेड्यात होत असल्याने गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ अशी हाक दिली. ज्यात गावखेडयाचे सक्षमीकरण हा महत्त्वपूर्ण हेतू होता. आजही या अभिनव मोहिमेची उपयुक्तता जाणवत असून शहरातील वाढता रोजगाराचा प्रश्न, वाढती गर्दी यामुळे गांधीजींचा हा मूलमंत्र आर्थिक समस्येचे निराकरण करण्याचा मार्ग सुचवतो. कृषी ग्रामीण क्षेत्रातील उत्पादकता, गुंतवणूक, रोजगारनिर्मितीचे महत्त्व आदी बाबी यातून स्पष्ट होते. प्रत्येक गावखेडी स्वयंपूर्ण व्हावे. ग्रामीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावे. असे महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात सांगितले होते.
परंतु आजच्या परिस्थितीत एका बाजूला बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग व अनेक मोठमोठ्या योजना राबविण्यात येत असल्यातरी दुसरीकडे खेड्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. कारण आजही खेडेगावात नेमुन दिलेले शासकीय कर्मचारी मुख्यालयात रहात नाहीत. कधीतरी घोड्यावर येतात व घोड्यावर निघुन जात असल्याने ज्या गाव, खेड्यातील लोकांची सेवा करण्यासाठी त्यांची नेमणूक केली गेली आहे. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची आपुलकी किंवा संवाद साधला जात नसल्याने गावागावातील समस्या कायम आहेत.
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावाबाबत दिसून येत आहे. कुरंगी हे खेडेगाव येथे संपूर्ण शेतकरी बांधव रहातात या गुण्यागोविंदाने राहतात असलेल्या गावातील ग्रामपंचायतीवर मागील दोन वर्षांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवक कार्यरत नसल्याने सगळा कारभार प्रभारी ग्रामसेवकांच्या भरवशावर सुरु आहे. प्रभारी ग्रामसेवक असल्याकारणाने शासनाच्या विविध योजना, सोयी, सवलती, गाव विकासाची कामे याबद्दल सविस्तर माहिती मिळत नाही. तसेच ग्रामस्थांना हवे असलेले दाखले, उतारे, योजना राबविण्यात येत नसल्याने या गावाच्या विकासासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
कुरंगी गाव हे मोठ्या लोकसंखेचे गाव असून या गावाला मागील दोन वर्षांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याचे लक्षात आणून दिल्यावरही उदासीन शासनाने अद्यापही कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्ती केलेली नाही. म्हणून गावागावातील नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर वसुलीसाठी मोठी अडचण येत आहे. करवसुली थांबल्यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना गावात पथदिवे लावणे, पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी, इतर समस्या सोडविण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने व मार्च महिन्याच्या शेवटी आर्थिक बजेट कोलमडल्याने सरतेशेवटी कुरंगी गावचे सरपंच मा. श्री. गणेश पाटील संचालक मा. श्री. योगेश पाटील, मा. श्री. नागराज पाटील, मा. श्री. पंढरीनाथ पाटील, मा. श्री. दिनकरराव सोनवणे, मा. श्री. शिलीक पाटील, मा. श्री. अविनाश कोळी ग्रामपंचायत कर्मचारी बापू पाटील, आण्णा पाटील, व दत्तू कोळी यांना सोबत घेऊन गल्लीबोळात, घरोघरी, दारोदार फिरुन करवसुली करण्यासाठी सुरवात केली आहे.
ग्रामपंचायतीच्या कर वसुलीसाठी चक्क गावचे सरपंच व संचालक मंडळ फिरत असल्याचे पाहून कुरंगी ग्रामस्थ अचंबित तर झालेच परंतु सर्व ग्रामस्थ कर भरण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे सरसावले आहेत. व चांगल्याप्रकारे कर वसुली होत असल्याचे दिसून येते आहे.