खाकी वर्दीचा सन्मान पोलीस विनोद अहिरे यांची राज्यस्तरीय कविसंमेलनाध्यक्षपदी निवड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०८/२०२२
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून, त्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये शासकीय,निमशासकीय तसेच विविध संस्थेमार्फत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून, अहमदनगर जिल्ह्यातील ‘विद्रोही साहित्य विचार मंच’ महाराष्ट्र, अहमदनगर, यांच्या वतीने चौदा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला *भारत माझा देश आहे* या शीर्षकाखाली राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातील ख्यातमान साहित्यिक, कवींना आमंत्रित केलेले असून, कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी जळगाव जिल्हा पोलीस दलातील साहित्यिक, कवी, समीक्षक ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे यांची निवड विद्रोही साहित्य विचार मंच महाराष्ट्र या संस्थेने ठराव पास करून केलेली आहे.
विनोद अहिरे यांना कवी संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे विद्रोही साहित्य विचार मंचचे सचिव अमोल घाटविसावे यांच्या सहीचे पत्र प्राप्त झालं आहे. त्यांनी आपल्या विनंती पत्रात म्हटले आहे की, विद्रोही साहित्य विचार मंचातर्फे ‘भारत माझा देश आहे’ या शीर्षकाखाली आम्ही राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन केलेले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी एक ‘सच्चा देशभक्त कवी’ असला पाहिजे असे आम्हाला वाटते.
“आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेत जीवाची पर्वा न करता कोरोना कक्षात केलेले कर्तव्य, तसेच मुख्यमंत्री कोविड सहायता निधीत दिलेले आपले संपूर्ण एक महिन्याचे वेतन, समाज माध्यमांवर कोरोना या विषाणू बाबत केलेले प्रबोधनात्मक लेखन, त्याचबरोबर आपण लेखन केलेल्या ‘मृत्यू घराचा पहारा’ या पुस्तकाच्या माध्यमातून पोलीस दलाचा त्यागाचा आणि शौर्याचा दिलेला परिचय, आपल्या ‘हुंकार वेदनेचा’ या काव्यसंग्रहातून समाजाला पोलिसांच्या वेदना कळाल्या, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी घेतलेली आपल्या कार्याची दखल, आपले हे सगळं कार्य आपल्यातील एका सच्चा देशभक्ताची जाणीव करून देते, आपण खऱ्या अर्थाने खाकी वर्दीतील अत्यंत संवेदनशील साहित्यिक, कवी आहात.” म्हणूनच आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजन केलेल्या ‘भारत माझा देश आहे’ या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते आपली निवड केलेली आहे. अशा आशयाचे विनंती पत्र विनोद अहिरे यांना विद्रोही साहित्य विचारमंच महाराष्ट्र यांच्याकडून प्राप्त झालेलं असून त्यांच्या या निवडीबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक, परिक्षेत्र नाशिक बी.जी .शेखर, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी अभिनंदन केलेले आहे.