सातगाव डोंगरी येथे विजेचा करंट लागून बैल ठार, सुदैवाने अनर्थ टळला.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०७/२०२२
सातगाव डोंगरी येथे शेतात पिकांची कोळपणी करत असतांना शेतात उभ्या विद्युत प्रवाह उतरलेल्या लोखंडी खांबाला स्पर्श झाल्याने कोळप्याला जुंपण्यात आलेल्या बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक ०३ जूलै २०२२ रविवार रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सातगाव डोंगरी येथील शेतकरी रघुनाथ मोहन बच्छे यांच्या शेतात बापू आनंदा पवार हे स्वताची बैलजोडी व कोळपणीसाठी लागणारा औत, फाटा घेऊन रोजंदारीवर कोळपणी करण्यासाठी आलेले होते. नियमितप्रमाणे कोळपणी सुरु होती. आज दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास कोळपणी सुरू असतांना शेतात उभ्या असलेल्या विद्युत खांबाजवळून जात असतांनाच अचानकपणे विद्युत खांबाला बैलाचा स्पर्श झाला बैल का थांबला लक्षात येताच बापू पाटील यांनी बैलाला काठीचा धक्का लाऊन त्याला हाकण्यासाठी प्रयत्न केला मात्र बापू पवार यांना विद्युत करंटचा झटका लागुन ते दहा फुटांपर्यंत लांब फेकले गेले व बैल जागीच कोसळला सुदैवाने बापू पवार हे लांब फेकले गेल्याने नशिबाने बचावले आहेत.
ही घटना घडताच विद्युत खांबात विद्युत प्रवाह उतरलेला असावा व विद्युत करंट लागल्याने बैल खाली पडला असावा असा अंदाज बांधून सावधानता बाळगत बैलाला स्पर्श न करताच इतर लोकांना आवाज देऊन घडलेली घटना निर्दशनास आणून दिली. ही घटना माहीत पडताच सातगाव डोंगरी येथील मोहन बच्छे, विजय राजपूत, सरपंच सुभाष पाटील व मनगटे सरांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत बैलाला कोणीही हात लाऊ नये अशा सूचना देऊन विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता मा. श्री. हेमंत तिवारी यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. माहिती मिळताच आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत तिवारी यांनी घटनास्थळी येऊन विद्युत पुरवठा बंद करुन तात्काळ दुरुस्ती केली. तसेच अपघात ठार झालेल्या बैलाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मडावी यांना बोलावून घेत घडलेल्या घटनेचा रितसर पंचनामा करुन ही माहिती वरिष्ठांना कळविल्याचे समजते.
या अकस्मात घडलेल्या घटनेत (अपघातात) सत्तर हजार रुपये किंमतीचा बैल ठार झाल्यामुळे याच बैलांच्या मदतीने रोजी, रोटी कमावणाऱ्या बापू पवार यांच्या उत्पन्नाचे साधन गेल्याने बापू पवार हे हतबल झाले असून आता त्यांच्या समोर संसाराचा गाडा कसा ओढायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी विद्युत वितरण कंपनी तसेच शासनाकडून या शेत मजुराला त्वरित मदत मिळावी अशी मागणी जनमानसातून केली जात आहे.