भाजपा खासदारांनी जनतेची दिशाभूल थांबवत पी.जे.रेल्वे पूर्ववत सुरू करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरले, आ.किशोर आप्पा पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१२/२०२१
जागतिक स्तरावर अजिंठा लेणीचे महत्त्व विचारात घेऊन पाचोरा ते जामनेर दरम्यान धावणाऱ्या पी.जे. रेल्वे मार्गाचे रुंदीकरण व विस्तारीकरण करून ते अजिंठा पर्यंत वाढवले जावे अशा प्रकारची सातत्याने मागणी होत असतांना देखील केंद्रातील भा.ज.पा. सरकार पाचोरा मतदार संघातील ब्रीटिशकालीन देण असलेल्या पाचोरा ते जामनेर धावणाऱ्या पी.जे. रेल्वे नॅरोगेज गाडी बंद करण्याचा घाट घालत असुन यामुळे पाचोरा रेल्वे स्थानकाचा जंक्शन दर्जा धोक्यात आला आहे.

?????????????
त्यामुळे प्रवाशी बांधवांना मिळणाऱ्या इतर सोयी सुविधा देखील कमी होण्याची भीती निर्माण झालेली असतांनाच जिल्ह्यातील भा.ज.पाचे दोन्ही खासदार मात्र अर्थसंकल्पात विस्तारीकरण व रुंदीकरणासाठी निधी मंजूर झाल्याची खोटी माहिती जनतेला देऊन जनतेची फसवणूक करत असल्याचा प्रहार शिवसेना आमदार किशोर अप्पा पाटील यांनी केला. तर ‘पी.जे. बंद झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा आमदार कीशोर आप्पा पाटील यांनी दिला आहे.
————-
ते पुढे म्हणाले की, खासदारांनी केवळ बघ्याची भूमिका घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम न करता पी.जे. गाडी बंद होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न करावा असा सल्ला देत. पी.जे. रेल्वे गाडी बंद झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अशी माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

भा.ज.पाच्या खासदारांच्या नाकर्तेपणाचा कळस झाला असून ब्रिटिश काळाची साक्ष असलेल्या पाचोरा ते जामनेर पी.जे. नॅरोगेज रेल्वेचा रेल्वे प्रशासनाने कोरोना महामारीचा फायदा घेत गाशा गुंडाळला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. देशातील सर्व कर्मचारी भुसावळ विभागात पाठविण्यात आले आहेत. तसेच महत्त्वपूर्ण फ्युएल पॉईंट बंद करण्यात आल्याने आता पी.जे. रेल्वे इतिहास जमा होणार असल्याचे भीतीदायक व तेवढेच संतापदायक चित्र निर्माण झाले आहे.
काही रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दबक्या आवाजात याबाबतची चर्चा सुरू असल्याने समाजमन संतप्त झाले आहे. पी.जे. रेल्वे पूर्ववत सुरु करण्यात यावी यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाणार असून त्याच्या निषेधासाठी सोमवारी दिनांक २० डिसेंबर सोमवार रोजी पाचोरा येथे सर्वपक्षीय, सर्व संस्था, संघटनांतर्फे बैठक होणार आहे. ब्रिटिश राजवटीत साधारण शंभर वर्षांपूर्वी पाचोरा ते जामनेर या मोठ्या शहरांत दरम्यान व्यापार-उद्योग विकसित व्हावा या हेतूने तसेच या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य हेरून नॅरोगेज रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला होता. ५७ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गात अनेक लहान मोठी खेडी आहेत या भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे जिनिंग व्यवसायाची ही चांगली प्रगती झाली होती.
कालांतराने व्यवहार व लोकसंख्या वाढल्याने हा मार्ग रेल्वे प्रवासी वाहतूक साठी सुरू झाला. कालांतराने त्यात बदल होत गेले. कोळसा इंजिन जाऊन डिझेल इंजिन आणले गेले. प्रथम पी.जे. रेल्वेच्या दिवसातून सहा फेऱ्या होत असत ५७ किलो मीटर अंतर दोन तासात पार होत असेल, त्यासाठी तीन हजार लिटर डिझेल लागत असे पाच डब्यांमधून तीनशे प्रवाशांची ने-आण केली जात होती. गोराडखेडा, शेंदुर्णी, पहूर, जामनेर व परत असा या गाडीचा प्रवास होता. प्रवास भाडे कमी असल्याने मोठ्या संख्येने प्रवाशांनी या गाडीला पसंती दिली होती.
कालांतराने अजिंठा लेणीचे जागतिक महत्त्व विचारात घेऊन या रेल्वे मार्गाचे रुंदीकरण व विस्तारीकरण करून तो अजिंठया पर्यंत वाढविला जावा अशा प्रकारची मागणी पुढे आली ती मागणी संसदेपर्यंत पोहोचली व गेल्या दहा वर्षांपासून विस्तारीकरण व रुंदीकरण कामासाठी निधीची अंदाजपत्रकात तरतूद झाल्याचे खासदारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या असतांनाच गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर इतर रेल्वे प्रमाणे ही पी.जे. रेल्वे देखील बंद करण्यात आली आहे.
परंतु आता हळू, हळू रेल्वे गाड्या सुरळीत सुरु होत असल्याने पी.जे. गाडी देखील सुरू करून मध्यमवर्गीय व सामान्य प्रवाशांना बसणारी आर्थिक झळ थांबवावी अशी मागणी पुढे आली असतांनाच या पी.जे. रेल्वे गाडीचा रेल्वे विभाग गाशा गुंडाळत असल्याचे समजले. काही रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांना देखील आपले नाव न सांगण्याच्या अटीवर त्यास दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे पाचोरा येथील रेल्वेच्या मुख्य केंद्रात कमालीची सामसूम असून एकही कर्मचारी तेथे नाही. फक्त गाडीचे डबे उभे आहेत. या मार्गासाठी महत्त्वपूर्ण स्टेशन बंद करण्यात आले असून येथील सर्व कर्मचाऱ्यांना भुसावळ विभागात वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आल्याचे खात्रीपूर्वक कळते.
खासदारांना आवाहन÷ हा प्रकार भा.ज.पाचे खासदार उन्मेश पाटील व रक्षा खडसे यांना घरचा आहेर ठरणारा असून एकीकडे खासदार विस्तारीकरण व रुंदीकरणाची जाहीर करतात. व दुसरीकडे मात्र ही रेल्वे बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनातर्फे घातला जात आहे. हे खासदारांना मोठे आव्हान आहे. पी.जे. गाडी बंद झाल्यास पाचोरा स्थानकाचा जंक्शन दर्जा संपुष्टात येऊन त्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा व सवलती देखील संपुष्टात येतील यात शंका नाही. या प्रकाराची कुणकुण शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना लागल्याने त्यांनी पी.जे. रेल्वे पूर्ववत सुरू करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
[दरम्यान यासंदर्भात पाचोरा येथील प्रवासी बांधव,सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येत घेतलेल्या बैठकीला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा असून वेळोवेळी या संदर्भात होणाऱ्या आंदोलनात शिवसेनेचा सक्रिय पाठिंबा असेल असे देखील पत्रकात नमूद करण्यात आले आहे.]