ग्रामसेवक नियमितपणे मुख्यालयात येत नसल्याने ग्रामस्थ अडचणीत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील बरेचसे ग्रामसेवक हे मुख्यालयाचे गावी न रहाता बाहेरगावाहून ग्रामपंचायतीचा कारभार पहातात व ते नियमितपणे मुख्यालयात येत नसल्याने खेड्यापाड्यातील जनतेची महत्वाची कामे वेळेवर होत नसल्याने ग्रामस्थसह, तरुणवर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यात महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरील देण्यात येणारे विविध दाखले यात रहिवासी दाखला, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, जातीचा दाखला, विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, हयातीचा दाखला, नोकरी व व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र, मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, विजेच्या जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, कोणत्याही योजनेचा फायदा घेतला नसल्याचे प्रमाणपत्र, शौचालय दाखला, बांधकामासाठी अनुमती प्रमाणपत्र, नळजोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र, चारित्र्याचा दाखला इत्यादी दाखले ग्रामसेवक मुख्यालयात रहात नसल्याने व कार्यालयीन वेळेत नियमितपणे येत नसल्याने वेळेवर मिळत नाहीत. गरजू लोकांना तालुकास्तरावर जाऊन ऑनलाईन दाखले मिळवण्यासाठी दैनंदिन कामकाज सोडून प्रवासखर्च, ऑनलाईन दाखला मिळवण्यासाठी लागणारा खर्च सहन करावा लागत आहे या प्रकारामुळे गोरगरिबांना ही खर्चिक बाब परवडणारी नसल्याने व दाखले वेळेवर मिळत नसल्याने बऱ्याचशा योजनांपासून वंचित रहावे लागते.
तरी लोकप्रतिनिधी व वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन ग्रामसेवकांना ठरवून दिलेल्या कार्यालयीन वेळेत नेमण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात हजर रहाण्यासाठी सुचना करुन कामकाजाची वेळ किती राहील व ग्रामसेवक केव्हा उपस्थित रहातील असा सुचना फलक लावून त्या वेळात ग्रामसेवकांना कार्यालयात हजर ठेवून ग्रामस्थांची अडचण दुर करावी अशी मागणी पाचोरा तालुक्यातील गाव, खेड्यापाड्यातील जनतेतून होत आहे.