वीरप्पनच्या पिल्लावळीला आलाय माज, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाताला खाज. दररोज शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल सुरुच.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०४/२०२४
सद्यस्थितीत पाचोरा, शेंदुर्णी, भडगाव व सोयगाव तालुक्यात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून दररोज विनापरवानगी स्वयंचलित मिशनच्या साह्याने शेकडो हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल करत आहेत. याबाबत वारंवार आवाज उठवला परंतु लाकुड व्यापाऱ्यांनी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा रूमाल गळ्यात घालून राजाश्रय मिळवून घेतला आहे. तसेच आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोराने वाहू लागले असल्याने कोणताही राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांवर कारवाई होऊ नये म्हणून ढाल बनून उभे ठाकले असल्याने इमानेइतबारे काम करणारे बोटावर मोजता येतील असे (काही) अधिकारी व कर्मचारी इच्छा असूनही कारवाई करु शकत नसल्याने ते हतबल झाले आहेत तर दुसरीकडे वनविभागाच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हाताला खाज सुटली असल्याकारणाने ते या विरप्पनच्या पिल्लावळीकडून हप्ते घेऊन महिन्याकाठी हजारो रुपये कमाई करून शासनाकडून मिळणाऱ्या कमी पगारात भागत नसल्याने हप्त्याच्या पैशात आपला संसाराचा गाडा ओढत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
यामुळे सगळीकडे दिवसाढवळ्या राजरोसपणे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु असल्याने निर्सगाच्या वातावरणात झपाट्याने होणारे बदल शोधले तर नक्कीच आपल्या लक्षात येईल की आपण निर्सगावर मात करायला निघालो आहोत. परंतु तरीही आपण चार पुस्तके शिकलेले लोक हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहेत. कारण शिकले सवरले लोक वातावरण उष्णता वाढली म्हणून घरांना वातानुकूलित यंत्रणा तसेच कुलर आणून कृत्रिम गारवा तयार करुन क्षणीक सुख घेत असले तरी भविष्यात वातावरणातील उष्णता वाढत जाऊन निसर्गाचा समतोल बिघडणार आहे. याचाच अनुभव आज येत असला तरी आपण डोळेझाक करत असल्याचे दिसून येते.
आजच्या परिस्थितीत उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात उन्हाळा, चक्रीवादळ, वातावरणातील झपाट्याने कमी होणारा ऑक्सिजन तसेच महत्त्वाचे म्हणजे ओझोन वायूचा कमी होणारा स्तर हे सगळे मुद्दे लक्षात घेतले तर नक्कीच थोड्याच दिवसात आपल्याला पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल व श्वासोच्छ्वास अडथळे निर्माण होतील तेव्हा ऑक्सिजनचा सिलेंडर पाठीवर घेऊन फिरावे लागेल हे नक्कीच म्हणून वेळीच जागे व्हा व निदान आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे म्हणून आजपासून वृक्षतोड थांबवून प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करा म्हणजे भावी पिढीला त्याचा फायदा होईल.