वेळीच करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन, कृषी पर्यवेक्षक मा. श्री. के. एफ. पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०९/२०२२

पाचोरा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सद्यस्थितीत पावसाने कहर केला असून जळगाव जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी हा संकटात सापडला आहे. कापूस पिकावरील वेगवेगळे किटक व मावा, तुडतुडे अश्या अनेक अडीअडचणीला सामोरे जात असतांनाच आता पावसाने मागील महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात जणूकाही मुक्कामच ठोकला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून आता पावसाने थोडीफार उघडीप दिली असली तरी कापूस पिकात आकस्मिक मर दिसून येते आहे. ही मर होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी पाचोरा तालुक्याचे कृषी पर्यवेक्षक मा. श्री. के. एफ. पाटील यांनी उपाय सुचवले आहेत.

बऱ्याच ठिकाणी पावसाच्या दिर्घ उघडीप नंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात.
कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते अशावेळी सिंचन दिल्यास अथवा मोठे पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा मोठे पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मरची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून शेतकऱ्यांनी काय उपाययोजना करायला हव्यात हे सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओत आपणासमोर मांडले आहे.

*आकस्मिक मर व्यवस्थापन*

१. अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा.
२. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
३. *लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया+ १०० ग्रॅम पालाश (पोटॅश) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली याप्रमाणे आळवणी करावी.

किंवा
१ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.*
४. वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.

वरील सर्व “उपाययोजना” शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल. तसेच अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन कृषी पर्यवेक्षक मा. श्री. के. एफ. पाटील यांनी केले आहे.

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ *०२४५२-२२९०००*

ब्रेकिंग बातम्या