पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है. पाचोरा तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरुच.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०२/२०२४
पाचोरा, भडगाव, जामनेर व सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु असून ही वृक्षतोड करतांना महसूल विभाग तसेच वनविभागाची कोणतीही रितसर परवानगी न घेताच दररोज हजारो हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे. एकाबाजूला बेसुमार वृक्षतोड सुरु असून दुसरीकडे महसूल व वन विभागाकडून चिरीमिरी घेऊन या अवैध वृक्षतोडीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे. या गलथान कारभाराबाबत बोलायचे झाल्यास “पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है” असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
कारण मागील आठवड्यात भोजे येथील समाजसेवक तसेच निसर्गप्रेमी मा. श्री. निलेश उभाळे यांनी भोजे येथील वाखारी बाबात तक्रार करुन चौकशीची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भोजे येथील वक्रतुंड सॉ मिलची सखोल चौकशी करुन त्याठिकाणी पडलेल्या लाकुड साठ्याची गणती करुन एक, एक इंच लाकडाचे मोजमाप केले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याबाबत चौकशीअंती काय कारवाई करण्यात आली आहे याबाबत मात्र चौकशी अधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारदाराला सविस्तर माहिती दिली नसल्याचे दिसून येते.
याच टोलवाटोलवीच्या खेळात वखार मालकांवर कडक कारवाई केली जात नसल्याने आजही पाचोरा, भडगाव, जामनेर व सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु आहे. विशेष म्हणजे स्वयंचलित मिशनच्या साह्याने काही क्षणातच झाडांची कत्तल केली जात असल्याचे दररोज शेकडो हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल होत असूनही पाचोरा, जामनेर व सोयगाव तालुक्यातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या वृक्षतोडीकडे अर्थपूर्ण डोळेझाक करत असल्याचे दिसून येते.
मागील आठवड्यात वनविभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी भोजे येथील वक्रतुंड सॉ मिलची सखोल चौकशी करुन कारवाई केली असली तरी मात्र आजही पाचोरा तालुक्यात सुरु असलेल्या अवैध वृक्षतोडीकडे पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने आजही लाकुड वखारीवर नियमबाह्य लाकुड खरेदी करुन या लाकडांची रात्रीच्या वेळी आरा मशिनवर कटाई करुन लगेच ट्रक भरुन या लाकडांची तस्करी होत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे शेंदुर्णी, लोहारा, भडगाव, पाचोरा येथील लाकुड वखारी ह्या भरवस्तीत असल्याकारणाने रात्रभर चालणाऱ्या लाकुड कटाईमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांना या आरा मिशनच्या आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे.
म्हणून बेसुमार वृक्षतोड थांबवून निसर्ग संपत्ती वाचवण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.