सावित्रीच्या लेकींना वेळेवर बस उपलब्ध करुन द्या अन्यथा स्वातंत्र्यदिनीच उपोषणाला बसणार. शांताराम बेलदार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०८/२०२३
स्री सबलीकरण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एकीकडे गोरगरिबांच्या मुलींना चांगले शिक्षण घेता यावे म्हणून तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील शाळा, कॉलेजमध्ये जाता यावे म्हणून शासनाने एस. टी. बसमधून प्रवास करण्यासाठी मोफत पास योजना अमलात आणली आहे. परंतु ही योजना जरी अमलात आणली असली तरी दुसरीकडे एस. टी. महामंडळाच्या मनमानी कारभारामुळे शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना वेळेवर बस उपलब्ध करुन दिली जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील लोहारा या मोठ्या लोकसंख्येच्या गावात घडत असून या लोहारा गावातून दररोज शेकडो मुलेमुली बाहेरगावी शिक्षणासाठी ये, जा करत आहेत. परंतु जळगाव, जामनेर व पाचोरा आगाराच्या व्यवस्थाकांच्या मनमानी कारभारामुळे या शेकडो विद्यार्थ्यांचे हाल होत असून वेळेवर बससेवा नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
याची दखल घेत लोहारा येथील समाजसेवक मा. श्री. शांताराम (आण्णा) बेलदार यांनी लोहारा येथील विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवा उपलब्ध करुन देण्यासाठी येत्या पंधरा ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिला आहे. शांताराम बेलदार यांनी अर्जात नमूद केले आहे की लोहारा ते शेंदुर्णी या मार्गावर शाळा, कॉलेजला जाण्यासाठी सकाळी सहा वाजता व दुपारी परतीच्या प्रवासासाठी बारा वाजता वर्षानुवर्षांपासून सुरु असलेली एस. टी. बस अचानकपणे बंद करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून ती एस. टी. बस पुर्वीप्रमाणे सुरु करण्यात यावी. तसेच सायंकाळी जळगाव येथून लोहारा येण्यासाठी सायंकाळी जळगाव येथून पाच वाजता लोहारा गावी येण्यासाठी त्वरित एस. टी. बससेवा सुरु करण्यात यावी अन्यथा मी येत्या १५ ऑगस्ट २०२३ मंगळवार पासून आमरण उपोषणाला बसेल असा इशारा विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांच्याकडे निवेदनाद्वारे शांताराम बेलदार यांनी दिला आहे.