बोगस खत निर्माता आरामात, मात्र विक्रेता कोमात, तर शेतकरी भ्रमात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०७/२०२३
सद्यस्थितीत पाचोरा व जामनेर तालुक्यात सरदार कंपनीच्या नावाने विकले जाणारे सरदार सुपर फॉस्फेट हे खत ज्या, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कापूस पिकाला दिले होते. अशा शेतकऱ्यांचे कापूस पिक हे कोमेजून गेले असून झाडांची पाने गळून पडतील अशी अवस्था निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात आल्यावर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी कृषी अधिकारी व प्रसारमाध्यमांनसमोर ही बाब उघड केल्यावर सुरवातीला खत विक्रेते व पाचोरा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात झटकले होते.
परंतु संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनासारखा पावित्रा घेतल्यानंतर नामदार मा. श्री. गिरीश भाऊ महाजन यांनी हा प्रश्न विधानसभेत घेऊन लगेच जळगावचे जिल्हाधिकारी मा. श्री. अमन मित्तल साहेबांना आदेश करत त्वरित चौकशी करण्यासाठी आदेश दिले होते. परंतु अद्यापही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे बोगस खते घेऊन नाडल्या गेलेल्या शेतकऱ्यांनी खत विकणाऱ्या कृषी केंद्राच्या संचालकांना जबाबदार धरून आमच्या शेतमालाची नुकसान भरपाई द्या अन्यथा आम्ही तुम्हाला न्यायालयात खेचू असा दम भरला असून निसर्गाचा लहरीपणा, बी, बियाण्याच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती व मागील वर्षी पिकविलेल्या कापसाला योग्य भाव न मिळाल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी काही ठिकाणी कृषी केंद्राच्या संचालकांना अरेरावीची भाषा करत मारठोक करण्याचा प्रयत्न केला असून कृषी केंद्रातून घेतलेल्या बी, बीजवाई व खतांचे पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
यामुळे बोगस खत निर्मिती करणारा कारखानदार आराम बसला असून खत विक्रेता मात्र कोमात गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र शेतकरी वर्ग अजूनही भ्रमात आहे. कारण एकाच कंपनीच्या नावाने खत बाजारात उपलब्ध असून कंपनी एक असली तरी एका थैलीचा रंग पांढरा व दुसरीचा पिवळा आहे. तसेच सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट हे खत बोगस असल्याचे सिद्ध झाल्यापासून मा. जिल्हाधिकारी यांनी थेट शेतात जाऊन सत्य परिस्थिती जाणून, समजून घेत रितसर पंचनामे करुन अहवाल पाठविण्याचे आदेश दिले असले तरी बोगस खतांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देईल या भ्रमात शेतकरी अडकला कसला तरी तसेच या बोगस खत विक्रीची संशयाची सुई तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जात असून त्यांची भुमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जात असून ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. म्हणून यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.