जामनेर येथील विरप्पनचा बिल्धी धरण परिसरात धुमाकूळ, निसर्गप्रेमी लवकरच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला लवकरच काळे फासणार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०६/२०२
आज ३० जून उजाडला तरीही पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. याबाबत जाणकार व तज्ञ लोकांच्या मते दिवसेंदिवस वाढणारी सिमेंटची जंगलं, झपाट्याने वाढणारी लोकसंख्या व त्यांच्या निवाऱ्यासाठी तसेच नवनवीन रस्ते, वाढती कारखानदारी, मोठमोठे प्रकल्प याकरिता दररोज हजारो एकर शेत जमिनीचे बिगरशेतीत होणारे रूपांतर व हे करण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने कापली जाणारी हिरवीगार झाडी तसेच लाकुड व्यापारी व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या जुगलबंदी खाजगी, सरकारी, राखीव जंगलासह इतर ठिकाणी सुरु असलेली विनापरवानगी हजारो हिरव्यागार वृक्षांची विनापरवाना होणारी कत्तल यामुळे दिवसेंदिवस पाऊस कमी पडत असल्याचे सांगितले.
हे सगळ कळत असल तरी ते आपल्याला वळत नसल्याने तसेच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व लाकुड व्यापाऱ्यांची अर्थपूर्ण जुगलबंदी व यांना मिळणारा राजाश्रय यामुळे या लाकुड व्यापाऱ्यांनी धुमाकूळ घालत पाचोरा तालुक्यातील शेतशिवारात, राखीव जंगलासह, धरण परिसरात व इतर शासकीय भूखंडावरील हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या खुलेआम स्वयंचलित यंत्राच्या साह्याने अवैधरित्या कत्तल सुरु केली आहे.
असाच गैरप्रकार पाचोरा तालुक्यातील बिल्धी धरण परिसरात सुरु असून या परिसरातील शेतशिवार, धरण परिसर व वनविभागाचे हद्दीत जामनेर तालुक्यातील एका विरप्पनच्या पिल्लावळीने (लाकुड व्यापाऱ्याने) धुमाकूळ घातला मागणी महिन्यांपासून आजपर्यंत जवळपास चारशे हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या खुलेआम अवैधरित्या कत्तल करुन हे लाकुड वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिच्चून वाहतूक करत घेऊन गेला आहे. या अवैध वृक्षतोडीला वनविभागाची अर्थपूर्ण संमती असल्याकारणाने या व्यापाऱ्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी जवळीक साधून फक्त आणि फक्त नावालाच दोन ते चार झाडे कापण्यासाठी रितसर परवानगी घेतली असून त्याच परवानगीवर आजपर्यंत चारशे झाडांची कत्तल झाली असून आजही हिरवीगार झाडे कापली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पाचोरा तालुक्यातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आमच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारची वृक्षतोड होत नाही असा आव आणून केलेल्या पापावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करत असले तरी आजही बिल्धी धरण, खाजगी मालकीच्या शेतात, राखीव जंगलासह, हम रस्त्यावर झाडे कापून नेल्यामुळे आजही झाडांची मोठ, मोठी खोड (बुंधा) शिल्लक राहिला असल्याने वनविभागाचे वाभाडे निघत आहेत.
(पाचोरा तालुक्यातील निसर्गप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात केली होती तक्रार.)
शासन आपल्या दारी या अभियानाअंतर्गत पाचोरा येथे दिनांक २८ जून २०२३ बुधवार रोजी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. अमन मित्तल साहेब आले असतांना निसर्गप्रेमींनी यांची भेट घेऊन पाचोरा तालुक्यासह सगळीकडे सुरु असलेल्या वृक्षतोडी बाबत तक्रार दाखल केली होती. तेव्हा मा. जिल्हाधिकारी यांनी योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. हा विषय वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना ज्ञात असल्यावरही हे अधिकारी व कर्मचारी सुरु असलेल्या अवैध वृक्षतोडीकडे जाणून, बुजून दुर्लक्ष करत असल्याने आजही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या खुलेआम कत्तल केली जात असल्याने निसर्गप्रेमी संतापले असून ही होणारी वृक्षतोड येत्या आठवडाभरात न थांबल्यास व उघड्यावर पडलेल्या लाकुड साठ्यावर जप्तीची कारवाई न झाल्यास वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दिसतील त्याठिकाणी त्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.