बहिणीला भेटायला जात असतांनाच काळाचा घाला, वरसाडे येथील तरुणाचा शिरसाळा तांडा येथे विज पडून दुर्दैवी मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०४/२०२३
[आंबादासच्या बाबतीत घडलेली ही घटना आपल्या सगळ्यांसाठी एक संदेश देऊन जाते की पावसाळी वातावरणात विजाचा लखलखाट व कडकडाट होत असल्यास उघड्यावर, किंवा झाडाखाली भ्रमणध्वनीचा वापर करु नये.]
माणसाचे जीवन हे क्षणभंगुर आहे असे म्हटले जाते व ते खरे ही आहे आपण जीवन जगत असतांना एक श्वास घेतला परंतु दुसरा श्वास घेता येईल की मी याची शाश्वती आता या धावपळीच्या युगात राहिलेले नाही. हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. दररोजच्या घडणाऱ्या घटनांमध्ये अपघात, घातपात, आत्महत्या अश्या अनेक कारणांमुळे आज डोळ्यासमोर दिसणारी आपली माणस झाडावरच्या पालापाचोळ्या सारखी निघून जात आहेस. अशीच मन हेलावून टाकणारी घटना काल सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांड्यावर घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील रहिवासी आंबादास भिका राठोड वय वर्षे (२७) हा तरुण मोलमजुरी व ऊसतोडणी करुन आपल्या घराचा गाडा ओढण्यासाठी सतत झटत होता. यावर्षीही तो ऊसतोडणी करण्यासाठी गेलेला होता. नुकताच ऊस तोडणीचा हंगाम संपल्यानंतर तो घरी आला होता. आंबादासचे यावर्षी लग्न करायचे आहे हा विषय घरात होत असल्याने आंबादास अधिकच आनंदाने रहात होता. तसेच ऊसतोडणीला गेल्यापासून बहिणीची त्याची भेट झाली नसल्याने बहिणीचे हालहवाल जाणून घेण्यासाठी तो काल उसतोडणीच्या कामावरून घरी आल्यावर स्वताच्या दुचाकीवरुन बहिणीला भेटण्यासाठी सिरसाळा तांड्याकडे निघाला होता.
आंबादास वरसाडे येथुन घरुन निघाला तेव्हा पाऊस येईल असे वातावरण नव्हते परंतु आंबादास वाटेवर असतांनाच सिल्लोड तालुक्यात आकाशात ढग व विजांचा गडगडाट व लखलखाट सुरु होता. आंबादास जसजसा शिरसाळा त्यांच्याजवळ जात होता, तसतसे वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सिरसाळा तांडा फक्त हाकेच्या अंतरावर असल्याने आंबादास सुखावला होता परंतू पाऊस सुरु असल्याचे पाहून कपडे ओले होतील म्हणून तो गावाजवळील एका निंबाच्या झाडाखाली काहीवेळ थांबला परंतु वादळासह विजेचा कडकडाटासह पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. आपल्याला जायला उशीर होत आहे बहीण चिंता करत असेल बऱ्याचशा दिवसांनंतर माझी व माझ्या बहिणीची भेट होईल म्हणून खुशीत आंबादासने भ्रमणध्वनी काढला व बहिणीला सांगण्यासाठी फोन करत असतांनाच काळाने डाव साधला व एक विज मोठा आवाज करत कडकडात आवाज करत निंबाच्या झाडावर कोसळली व याच झाडाखाली थांबलेल्या आंबादासला घेऊन गेली.
विज पडल्याचा जोरदार आवाज होताच त्या निंबाच्या झाडापासून काही अंतरावर असलेल्या घरातील लोकांनी झाडाकडे पाहिले असता झाडाखाली एक इसम पडलेल्या अवस्थेत दिसून आला म्हणून संबंधितांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली असता एक दुचाकी व एक तरुण विज पडून मयत झाल्याचे दिसून आले. हि वार्ता सिरसाळा तांड्यावर पोहचताच सगळे गावकरी घटनास्थळी दाखल झाल्यावर आंबादासची ओळख पटली भेटीसाठी आलेल्या भावाला मृत अवस्थेत पाहून बहिणीने हंबरडा फोडला लगेचच घडलेल्या घटनेबद्दल वरसाडे तांड्यावर कळवण्यात आले. ही बातमी ऐकुन आंबादासचे आई, वडील, भाऊ व बहिणींनी एकच आक्रोश सुरू केला.
या अकस्मात घडलेल्या घटनेमुळे सिरसाळा तांडा व वरसाडे तांड्यावर शोकमय वातावरण निर्माण झाले होते. ही घटना माहीत पडताच सिल्लोड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मा. श्री. साहेबराव शळके यांनी घटनास्थळी धाव घेतली व लगेचच पोलिसांना खबर दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून सिरसाळा येथून मयत आंबादास याचा मृतदेह सिल्लोड येथे नेऊन उत्तरीय तपासणीसाठी नेवून तपासणीनंतर वरसाडे तांड्यावर आणून रात्री शोकमय वातावरण त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील पदाधिकारी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
“आंबादासच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी”
—————————————
आंबादासच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे कुटुंबीय मोलमजुरी व ऊसतोडणी कामगारांच्या सोबत जाऊन आपला उदरनिर्वाह चालवत होते. आंबादासच्या पाश्चात पाच बहिणी एक भाऊ व आईवडील असा परिवार आहे. घरातील कमावता मुलगा अचानकपणे निघून गेल्याने राठोड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने ते हतबल झाले आहेत पैशाने आंबादासची उणीव भरून निघणार नाही परंतु शासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे अशी मागणी करण्यात येत आहे.