कृषी अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधरांनी महामहीम राष्ट्रपती व उपमुख्यमंत्री यांना रक्ताने पत्र लिहून सुरु केलेल्या आंदोलनाचा आज उजाडला ३५ वा दिवस.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०२/२०२३
कृषि अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधरांनी मागील ३५ दिवसांपासून राहुरी कृषी विद्यापीठाच्या समोर आंदोलन सुरु केले असून ३५ दिवस उलटले तरीही शासनाने या आंदोलनाकडे लक्ष दिले नाही म्हणून सरतेशेवटी सर्व विद्यार्थ्यांनी रक्ताने पत्र लिहून शासनाला कुंभकर्ण झोपेतून जागे करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
कारण जीवंतपणी आमचे अधिकार आम्हाला मिळत नसतील तर जगून फायदा काय या विवंचनेत हे विद्यार्थी आहेत. कारण काबाडकष्ट करून ज्या पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले व शिक्षण घेतल्यानंतरची स्वप्न रंगवली त्यालाच ग्रहण लागल्यामुळे आमच्या मुलामुलींच्या भविष्य अंधारातच का हा प्रश्न विचारला जात आहे. या आंदोलनात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेचा जो नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे त्यामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या पदवीला एकुण ४०० गुणांपैकी फक्त १६ गुण देण्यात आले आहेत आणि या अभ्यासक्रमाआधारे पहिली एकुण २०३ गट अ व ब पदांसाठी महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा दिनांक १ आक्टोंबर २०२२ ला घेतली असून दुसरी एकुण २१३ गट अ व ब पदांसाठी पूर्व परीक्षा दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी घेतली असून याची मुख्य परीक्षा घेण्याचे दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी नियोजित आहे. या अन्यायकारक धोरणामुळे कृषि अभियांत्रिकी शाखेच्या पदवीच्या उमेदवारांवर खुप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला असून समान नैसर्गिक संधीच्या तत्वाचे उल्लंघन झाले आहे.
कृषि अभियांत्रिकी पदवीधारकांवर कृषि सेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमामुळे अन्याय होत असल्याने हे अन्यायकारक धोरण तात्काळ थांबावे आणि या दोन्ही परीक्षेला तात्काळ स्थगिती द्यावी. राज्यांमध्ये कृषि अभियांत्रिकी शाखेसाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करावे. मृद व जलसंधारण विभागामध्ये कृषि अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ पासून इतर शाखेच्या वैकल्पिक विषयांप्रमाणे कृषि अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करण्यात यावा या मुख्य मागण्या आहेत.
आंदोलनाला ३५ दिवस उलटले तरीही काही निर्णय होत नसल्याने पुढील काळात आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास किंवा निराशा पदरी पडल्यावर हे आंदोलनकर्ते टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती व्यक्त केली जात असून होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहील असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.
विद्यार्थ्यांनी~
आमचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून आमच्या आईवडिलांनी काबाडकष्ट करुन आम्हाला चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला आहे. कारण मुलगा वंशाचा दिवा असतो तर मुलगी ही दोन घरातील लक्ष्मी असते असे आमचे आईवडील समजतात. व आम्ही आज नाही तर उद्या दुसऱ्याच्या घरी जाणार असून आपलं आयुष्य स्वाभिमानाने जगता यावे म्हणून आमच्यावर लाखो रुपये खर्च करत आहेत. व शासनाच्या या गलथान कारभारामुळे आमच्या आईवडिलांसह आमच्या आयुष्याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. म्हणून आतातरी शासनाने आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.