शेंदुर्णी नगरपंचायत तर्फे कळमसरा येथील ध्येयवेड्याचा, माझी वसुंधरा ब्रॅंड अँबेसेडर (पर्यावरण दूत) म्हणून सन्मान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०२/२०२३
एका बाजूला सगळीकडे निसर्गाचा मोठ्याप्रमाणात ऱ्हास होत असतांनाच दुसरीकडे “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हे ब्रीद लक्षात घेऊन निसर्ग वाचवण्यासाठी अहोरात्र धडपड करणारा पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावातील एक ध्येयवेडा गंगा नर्सरीचे मालक मा. श्री. दत्तात्रेय तावडे हे सगळ्यांनाच सुपरिचित आहेत. त्यांना शेंदुर्णी नगरपंचायत तर्फे नुकतेच माझी वसुंधरा ब्रँड अँबेसेडर ( पर्यावरण दूत) २०२३ म्हणून सन्मान करण्यात आले आहे.
निसर्ग संपत्तीचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी व ती वाढविण्यासाठी शासनाने महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माझी वसुंधरा या अभियानाअंतर्गत पर्यावरण रक्षण व निसर्ग जागर या उद्देशाने हे अभियान सुरु केले होते. या अभियानाअंतर्गत जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीने सहभागी होऊन हे अभियान योग्य पध्दतीने राबविण्यासाठी शेंदुर्णी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील गंगा नर्सरीचे संचालक मा. श्री. दत्तात्रेय तावडे यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करत यांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण असे अनोखे असे उपक्रम राबविले होते.
या उपक्रमात वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, नैसर्गिक वन भिंत उभारणे, ऑक्सिजन पार्क तयार करणे, नदी तटावर तटबंदी तयार करणे सोबतच झाडांचे महत्व पटवून देत झाडाझुडुपांना मानवी जीवनात किती महत्व आहे. याबाबत जनजागृती करुन माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत नियोजनबद्ध झालेल्या कामांचे शासनाच्या निवड समितीने परिक्षण करत शासनाच्या निकषाप्रमाणे अभियान राबविण्यात आले असल्याचे दिसून आल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायत गटातून शेंदुर्णी नगरपंचायतीची निवड करण्यात येऊन व्दितीय क्रमांक देत दोन कोटी रुपयांचे
बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
हे अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व बक्षिस मिळण्यास पात्र ठरण्यासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून ज्यांनी काम पाहिले व योग्य मार्गदर्शन करत शासनाच्या नियमानुसार हे अभियान राबवून शासनाचा शंभर टक्के हेतू साध्य केला असे कळमसरा येथील मा. श्री. दत्तात्रेय तावडे यांना महाराष्ट्र राज्याचे (क्रीडा युवक कल्याण व ग्रामविकास मंत्री) मा. ना. गिरीश भाऊ महाजन यांच्याहस्ते दिनांक ०५ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी नुकतेच सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी, लोकनेते पंडितराव जोहरे, गोविंदशेठ अग्रवाल , अमृत बापू खलसे, ज्येष्ठ भाजप नेते उत्तम दादा थोरात, प्रकाश जंवर, नगराध्यक्ष सौ. विजयाताई खलसे, तथा इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.