डांभुर्णी परिसरात लांडग्यची दहशत, आजपर्यंत तीन शेळ्या फस्त. वनविभागाकडून उडवाउडवीची उत्तरे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या डांभुर्णी शेत शिवारात तसेच गाव परिसरात मागील काही दिवसापासून लांडग्याने धुमाकूळ घातला असून लांडग्याने आजपर्यंत तीन शेळ्या ठार केल्या आहेत. याबाबत वन विभागाला वारंवार कळवून सुद्धा वन विभागाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याने डांभुर्णी, प्रिंप्री, वरखेडी परिसरातील शेतकरी, नागरिक भयभीत व संतप्त झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यात मागील काही महिन्यांपासून जंगली श्वापदांनी धुमाकूळ घातला असून मागील दोन महिन्यात वेगवेगळ्या शिवारात बिबट्याने हल्ला चढवत शेळ्यांचा खात्मा केला होता. तसेच आज दिनांक ३ ऑगस्ट २०२२ बुधवार रोजी पहाटेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथे विजय प्रकाश परदेशी यांच्या घराच्या मागील बाजूस गावाजवळील असलेल्या गुरांच्या गोठ्यात घुसून लांडग्याने एक शेळीच्या नरडा फोडून ठार केल्याची घटना घडली आहे. तसेच या पूर्वी उत्तम नारायण परदेशीं यांच्या दोन शेळ्या पंधरा दिवसा पूर्वी व राजू शामलाल परदेशीं यांची एक शेळी लांडग्याने फस्त केल्या आहेत.
हा हल्ला पाहून गोठ्यात बांधलेल्या इतर गुराढोरांनी हंबरडा फोडल्यामुळे संबंधित शेतकऱ्याने गोठ्याकडे धाव घेतली व मदतीसाठी आरडाओरडा केला हे पाहून लांडग्याने शेळी सोडून पळ काढला. परंतु या हल्ल्यात शेळी ठार झाली आहे. याबाबत संबंधित शेळी मालक शेतकऱ्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे घडलेल्या घटनेचा तपशील कळवला असता तुम्ही ऑनलाईन अर्ज करा मग आम्ही पंचनामा करण्यासाठी येऊ असे सांगितले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे संबंधित शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज करुन तशी प्रत वनविभागातील कार्यालयात दाखवली व संबंधित संपर्क साधून माहिती दिली असता आता तुम्ही ऑफलाईन अर्ज करा मग आम्ही पंचनामा करण्यासाठी येऊ असे सांगण्यात आल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
लवकरात, लवकर जागेवर येऊन घटनास्थळ व ठार झालेल्या शेळीचा पंचनामा न झाल्यास शेळीची दुर्गंधी सुटेल व कुत्रे त्रास देतील असे शेतकऱ्याचे म्हणणे असून पंचनामा झाल्याशिवाय नुकसान भरपाई मिळणार नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात कायमस्वरूपी हजर रहात नसून गरजू व अडचणीत असलेले किंवा वनविभागाबाबत काही माहिती विचारण्यासाठी शेतकरी, ग्रामस्थ, निसर्गप्रेमी, पशु, पक्षी प्रेमी वनविभागाचे कार्यालयात गेल्यावर अधिकारी व कर्मचारी भेटतीलच याची शास्वती नसते व भेटलेच तर ते कोणतीही समाधानकारक माहिती किंवा शंकेचे निरसन करत नसल्याच्या तक्रारी येत असून वरिष्ठ अधिकारी या बाबींकडे लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.