एस.टी.सेवा बंद, अवैध प्रवासी वाहतूक करणारे झाले बेधुंद, जिवीतहानी होण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१२/२०२१
(एस.टी.सेवा बंद असल्याने मिळेल त्या प्रवासाच्या साधनाने प्रवास करणे गरजेचे आहे.परंतु हे करत असतांनाच स्वताच्या व दुसऱ्याच्या जिवाची काळजी घेणे गरजेचे आहे. मागील चार दिवसात जळगाव जिल्ह्यात भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांचे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. यात जामनेर, पाचोरा, भडगाव तालुक्यातील घटना भयवाह झाल्या आहेत. म्हणून हे वृत्त पुराव्यानिशी आपल्या समोर ठेवत आहे.)
एस.टी.महामंडळाने संप पुकारल्या पासून सर्वसामान्य जनतेसह, विद्यार्थीवर्ग, वयोवृद्ध, दिव्यांग यांना प्रवास करणे कठीण झाले आहे. परंतु दैनंदिन जीवनासाठी प्रवास करणे गरजेचे असल्याने गरजू प्रवासी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहेत. कारण जीवनामध्ये काही गोष्टी व काही कामे वेळेवर करणे खूप गरजेचे असते. तसेच मागील वर्षापासून शाळा बंद होत्या त्या आता सुरु झाल्या आहेत. अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील आहेत. परंतु हे करत असतांना बाहेर गावी जाण्यासाठी व परत येण्यासाठी एस.टी. सेवा बंद असल्याने सगळेच खाजगी गाड्यातून प्रवास करत आहेत. परंतु खाजगी गाडी मालक व चालक एस.टी. सेवा बंद असल्याने बेधुंद होऊन प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरून भरधाव वेगाने गाड्या पळवत आहेत.
यातूनच अद्याप पर्यंत पाचोरा, भडगाव, जामनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात बरेच अपघात झालेले असून या अपघातात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झालेली आहे. खाजगी मालवाहू गाड्यांमधून जर अशीच प्रमाणापेक्षा जास्त क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरु राहिल्यास एखादेवेळी पुन्हा मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
कारण आता सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. त्यातच लग्नसराईचा बिगुल वाजला आहे. लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळीला ने, आण करण्यासाठी मालवाहू वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तर काही कापूस व्यापारी कापूस मोजणी, हमाली करणाऱ्या मजूरांना ट्रकच्या टपावर बसून वाहतूक करतांना दिसून येतात. याचे कारणही तसेच आहे एस.टी. सेवा बंद झाल्यामुळे खाजगी प्रवासी वाहतुकीला अडवणूक करू नये असे राज्य सरकारचे आदेश असल्याचे बोलले जाते. मग या (तोंडी) आदेशानुसार अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर आर.टी.ओ. किंवा पोलीस अश्या वाहनांवर कारवाई करू शकत नाहीत, असे काही खाजगी प्रवासी वाहतूक करणारे सांगतात.
त्यामुळे एका बाजूला एस.टी. सेवा बंद असतांना दुसऱ्या बाजूला खाजगी (विशेष म्हणजे) मालवाहतूक करणारे वाहन मालक व चालक बेधुंद होऊन प्रवाशी वाहतूक करत आहेत. परंतु अश्या प्रमाणापेक्षा जास्त व वाहनाचे टपावर बसवून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे. फक्त वाहनधारकांवर नव्हे तर या अवैध प्रवासी वाहतूक मध्ये सहभागी होणाऱ्या प्रवाशांनाही किमान पन्नास रुपये दंडाची पावती या आकारण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
(अश्या वाहतूकीने रस्त्यावर चालणऱ्या निष्पाप लोकांचेही हकनाक बळी जात आहेत.)