पाचोरा शहरात वर्दळीच्या ठिकाणी पाणपोई सुरु करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०४/२०२४
[कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा]
सद्यस्थितीत सगळीकडे सुर्य आग ओकतोय अशा परिस्थितीत घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. मात्र दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडणे गरजेचे असते म्हणून बरेचसे लोक तालुका व जिल्हास्तरावर दैनंदिन कामानिमित्ताने येत असतात परंतु या शहरात आल्यावर त्यांना रखरखीत उन्हात फिरुन आपली कामे पार पाडुन घ्यावी लागतात. याच धावपळीत त्यांना गरज असते ती कुठेतरी विश्रांती घेण्यासाठी सावली व पिण्याच्या थंडगार शुध्द पाण्याची परंतु सद्यस्थितीत जिल्हा व तालुकास्तरावरील शहरात या दोघीही सुविधांचा वानवा जाणवतो आहे.
कारण शहरांच्या विकासाच्या नावाखाली सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत सोबतच रहदारीला अडथळा निर्माण व्हायला नको म्हणून सिमेंटचे रस्ते बनवण्यात आले आहे मात्र या सुधारणा करतांना शहरातील वर्षानुवर्षांपासून असलेले महाकाय वृक्ष कापून टाकण्यात आले असल्याने व योग्य ठिकाणी पुन्हा वृक्षलागवड न केल्यामुळे शहरात एकप्रकारे निसर्ग संपत्तीचा ऱ्हास होऊन सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. यामुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होऊन तापमानात कमालीची भर पडली आहे.
अशीच परिस्थिती पाचोरा शहरात निर्माण झाली असून भडगाव व पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यातील लोक दैनंदिन कामासाठी पाचोरा शहरात येत असतात. मात्र पाचोरा शहरात आल्यावर ज्या कामासाठी हे लोक आलेले असतात त्यांची कामे वेळेवरच होतील याची शाश्वती नसते म्हणून त्यांना या कडकडीत उन्हात दिवस, दिवस थांबावे लागते परंतु पाचोरा शहरात थांबल्यानंतर गरज भारते ती पिण्याच्या पाण्याची मग अशावेळी घशाला कोरड पडल्यानंतर गरजूंना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसते म्हणून कुठेतरी हॉटेल किंवा उपहारगृहात जाऊन पाणी प्यावे लागते असे असले तरी (सगळेच नाही) काही हॉटेलचे व उपहारगृहाचे मालक काहीतरी वस्तू घेतल्याशिवाय पाणी मिळणार नाही अशी अट घालतांना दिसून येतात मग अशावेळी खिशात पैशांची चणचण असतांनाही इच्छा नसतांना तहान भागवण्यासाठी पदरमोड करुन आपली तहान भागवावी लागते.
परंतु पाचोरा शहरात येणाऱ्या प्रत्येकाचीच परिस्थिती खर्च करण्यासारखी असते असे नाही म्हणून काहींना तर भर उन्हात घशाला कोरड घेऊन फिरावे लागते व यातुनच त्यांना उन्हाळी लागणे किंवा उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पाचोरा शहरातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक, सामाजिक संघटना यांनी पुढे येऊन पाचोरा शहरातील वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती भडगाव रोड, आठवडे बाजार, श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यालयाजवळ किंवा तहसील कार्यालय, रेल्वे स्थानक, बसस्थानक, जैन पाठशाळा, कृष्णापुरी, जारगाव चौफुली, भारत डेअरी स्टॉप, कॉलेज रोड अश्या महत्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी पाणपोई सुरु गरणे अत्यंत गरजेचे आशहे.
तसेच तालुक्यातील गावागावातून पाणपोई सुरु केली पाहिजे
कारण सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती नसलेल्या व्यक्तीला पाचोरा शहरात येऊन दहा ते पंधरा रुपये किंमतीची शुध्द पिण्याच्या पाण्याची बाटली घेणे शक्य नसल्याने पाचोरा शहरात लवकरात, लवकर पाणपोई सुरु होतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.