“ॲक्वा फिल्टर उशाला आणि कोरड पडली घशाला” अंबे वडगाव ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०६/२०२३
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गृप ग्रामपंचायत असून यात वडगाव जोगे व कोकडी तांडा या गावांचा समावेश आहे. या गृप ग्रामपंचायतीवर मागील पाच वर्षांपासून श्रीमती कलाबाई हरिभाऊ शळके (पाटील) या लोकनियुक्त सरपंच होत्या परंतु त्या वयोवृद्ध असल्याकारणाने व प्रकृती साथ देत नसल्याने यांच्या संपूर्ण कार्यकाळात ग्रामपंचायत सदस्यांनी आळीपाळीने प्रभारी पद सांभाळून गाव विकासासाठी प्रयत्न करत बऱ्याचशा योजना राबविल्या याच प्रभारी सरपंचांच्या कार्यकाळात ग्रामपचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता या ग्रामपंचायतीवर प्रशासक राज आहे.
श्रीमती कलाबाई शकळे यांच्या कार्यकाळात अंबे वडगाव येथील ग्रामस्थांना पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून मागील अंदाजे दोन वर्षांपूर्वी दोन ते अडीच लाख रुपये खर्चून ॲक्वा फिल्टर बसवण्यात आले आहे. परंतु हे ॲक्वा फिल्टर बसविल्यानंतर नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे कही महिने सुरळीत सुरु होते. मात्र हे ॲक्वा फिल्टर तांत्रिक बिघाड होऊन काही महिन्यातच बंद पडले असून आज जवळपास दोन वर्षांपासून ते नादुरुस्त अवस्थेत कायमस्वरूपी बंद अवस्थेत पडले आहे.
हे ॲक्वा फिल्टर बसवले तेव्हा पावसाळ्यात, हिवाळ्यात व विशेष करुन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्यासाठी शुध्द व थंडगार पाणी मिळेल अशी स्वप्ने ग्रामस्थांनी उराशी बाळगली होती. परंतु ग्रामपंचायतीवर सतत प्रभारी राज्य असल्याकारणाने ढिसाळ कारभारामुळे हे ॲक्वा फिल्टर एक शोभेची वस्तू म्हणून उभे आहे. याबाबत वारंवार मागणी करुनही हे ॲक्वा फिल्टर आजपर्यंत दुरुस्ती करुन सुरु करण्यात आले नसल्याने दोन ते अडीच लाख रुपये किंमतीचे ॲक्वा फिल्टर असल्यावरही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकत फिरावे लागत आहे.
कारण रविवार दिनांक ०४ जून रविवार रोजी वादळवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली या वादळवाऱ्यात घराची पत्रे उडून गेली, मोठमोठे वृक्ष कोलमडून पडले तसेच विजेचे खांब पडल्याने अंबे वडगाव गावाची पाणीपुरवठा योजना मागील पाच दिवसांपासून ठप्प झाली असल्याने दिवसभर शेतात काम करुन थकून, भागुन आलेल्या माय, माऊलींना घरात वापरासाठी व पिण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन गाव परिसरातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे.
“ॲक्वा फिल्टर उशाला आणि कोरड पडली घशाला”
———————————————————–
अंबे वडगाव ग्रामपचायतीने मागील मागील दोन वर्षांपूर्वी बसवलेले ॲक्वा फिल्टर जर आज सुरळीतपणे सुरु असते तर या ॲक्वा फिल्टरच्या जवळच म्हणजे फक्त पंधरा फुटावर गावाची (बारो) नावाने ओळख असलेली जाणारी जिवंत पाण्याची पाणवठा विहिर आहे. या विहिरीचे पाणी ॲक्वा फिल्टर मध्ये शुध्द करुन ते ग्रामस्थांना उपलब्ध करुन देता येईल परंतु परंतु ग्रामपचायतीवर प्रशासकीय अधिकारी कामकाज पहात असून ॲक्वा फिल्टर दुरुस्तीसाठी पैशाची गरज भासत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून निव्वळ ढिसाळ नियोजनामुळे आज ग्रामस्थांना पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी वनवन भटकत फिरावे लागत असल्याने ग्रामस्थ व महिलावर्गातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
“दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका”
——————————————————–
अंबे वडगाव गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ असलेले विद्युत खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प झाली असून पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी खांब उभारणी करणे गरजेचे आहे. मात्र अंबे वडगाव ग्रामपंचायतीकडे विद्युत वितरण कंपनीचे लाखो रुपये वीजबिल थकीत असल्याकारणाने संबंधित अधिकारी अगोदर वीजबिल भरणा करा तरच तुमचा विद्युत पुरवठा जोडण्यात येईल अशी अट घातली असल्याने अद्यापही विद्युत पुरवठा जोडण्यात आला नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
ग्रामस्थांना गरज भागविण्यासाठी शेतशिवारात व गावाच्या आसपासच्या पडिक विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असल्याने या अशुद्ध पाण्यामुळे एखाद्यावेळेस ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. तरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करुन लवकरात, लवकर पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
शेवटी एकच “ॲक्वा फिल्टर उशाला आणि कोरड पडली घशाला” असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.