“राजे आम्हाला माफ करा, भलेही आमचा कडेलोट करा” संतोष पाटील.
दिनांक~१८/०२/२०२३
*राजे आम्हाला माफ करा*
*भलेही आमचा कडेलोट करा*
संतोष पाटील.
—————————————-
शहाजीराजे व आई जिजाऊ यांनी पाहिलेलं स्वराज्य नावाचं गोड स्वप्न साकार करणारे *कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज* यांना प्रथम मानाचा मुजरा. या पवित्र भूमीवर आदिलशहा व निजामशाह अतिशय क्रूर अशा बादशहांचं राज्य होतं, राज्यातील गरीब दुबळ्या जनतेचं शोषण करणं, त्यांचा मानसिक, धार्मिक, शारीरिक, आर्थिक छळ करून जगणे असाह्य करणं आमच्या देव देवता धर्म संस्कृती आणि आमच्या स्त्रियांवर अन्याय करणं अशा अनेक गोष्टी या जुलमी राजवटीत सुरू होत्या, हा अन्याय अत्याचार आऊ जिजाऊंना सहन झाला नाही त्यांच्या मनामध्ये या राजवटीचा प्रचंड तिरस्कार होता आणि हा तिरस्कार हा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी आपलं स्वतःचं राज्य पाहिजे स्वतःची कार्यपद्धती पाहिजे असे विचार जिजाऊंच्या मनामध्ये येत होते, अशातच १९ फेब्रुवारी १६, ३० रोजी शहाजीराजे व जिजाऊ यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, आता इथून पुढचा इतिहास तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीतच आहे.
राजे जन्माला आले अतिशय बिकट परिस्थितीमध्ये स्वतःच राज्य निर्माण केलं आदर्श अशी राज्यपद्धती त्या शिव काळामध्ये होती तो शिवकाळ म्हणजे देव काळ होता, माया बहिणी गरीब दुबळा शेतकरी आणि त्या काळातील बारा बलुतेदार अठरापगड जाती हे सगळे सुखा समाधानाने जगत होते, प्रत्येकाला ज्याचा त्याचा व्यवसाय, धर्म हा सुरक्षित वाटत होता महाराजांची कारकीर्द राज्य चालवण्याची पद्धत ही अद्वितीय होती या कार्यपद्धतीचा आधार घेऊन भारतासह जगातील असंख्य देशांनी आपली कार्यपद्धती ठरवली, मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य जगानं स्वीकारलं पण आजही महाराजांच्या देशात राष्ट्रात हे पूर्णपणे स्वीकारलेलं दिसत नाही.
मला एका गोष्टीचं वाईट वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आजही काही देश राज्य करत आहेत मात्र आमचा देश या विचारांना विसरून आपली कार्यपद्धती चालवत आहे, मित्रहो आम्ही विसरून गेलोय की असे एक आदर्शवत राजे आमच्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले त्यांचे विचार आचार कार्यपद्धती सगळं आपण विसरून गेलो, अनेक नको त्या गोष्टींसाठी या सरकारातील लोकांनी वेळोवेळी भरमसाठ निधी खर्च केला मात्र माझ्या राजांच्या स्मारकासाठी ते विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या लोकांनी निधी खर्च केला नाही व ते करत नाहीत, आता तर या लोकांनी कहरच केला राजांचा अपमान केला राजांची तुलना इथल्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोकांशी करून या महाराष्ट्रातील तमाम मावळ्यांवर या लोकांनी आघात केला महाराजांची विटंबना झाली अपमान झाला तरीही आम्ही काहीच बोलत नाही आम्ही काहीच बोललो नाही, ज्या लोकांनी राजांचा अपमान केला तेच लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत आणि आम्ही कपाळ करंटे स्वतःला महाराजांचे मावळे समजणारे लोक या गद्दरांच्या काफील्यात सामील होत आहोत.
म्हणून राजे हो आम्हाला काहीच कळत नाही आमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे आम्ही दिशाहीन झालो आहोत या उघड्या डोळ्यांनी आम्हाला येथे काहीच दिसत नाही, रोज 43 शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांचे वाटोळ होत आहे दिवस ढवळ्या आई बहिणींवर अत्याचार होत आहेत आम्हाला धर्मांध केले जात आहे तरी आम्ही काहीच बोलत नाही आम्हाला काहीच दिसत नाही, आम्ही *शिवतंत्र, शिवतत्व, शिवनीती, शिवशास्त्र, आणि शिवशक्ती* विसरून गेलो आहोत. राजे तुमची जयंती साजरी करायचा आम्हाला मुळीच अधिकार नाही राजे आमचा चौरंगा करा भलेही कडेलोट करा पण आम्हाला माफ करा आम्हाला माफ करा…..
संतोष पाटील
७६६६४४७११२