आता खाजवा की कापूस विकायला डोक, अशी वेळ कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०२/२०२३
यावर्षी कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने आज ना उद्या भाववाढ होईल या आशेवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस न विकता घरातच भरुन ठेवला असल्याने कापूस घरात असल्याकारणाने अगदी जपून रहावे लागते आहे. घरातील काड्या पेटी, कदाचित एखाद्यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास रात्रीच्या वेळी दिवा लावणे, घरातील देव्हाऱ्यात आरती लावणे, अगरबत्ती लावणे हे अत्यंत जबाबदारीचे काम झाले असल्याने सद्यस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अंधारात रहाणे पसंत केले असून देव पूजेलाही तिलांजली दिली आहे. विशेष म्हणजे कापूस घरात पडून असल्याकारणाने त्याच्यात बारीक किटक पडले असून घराघरातील लोकांना अंगाला खाज येऊन अंगावर बारीक पुरळ उठत आहेत व या त्रासाला कंटाळून व आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी कापूस विक्रीसाठी काढतो तेव्हा चांगला भाव मिळत नसल्याने भाव ऐकुन डोकं खाजवायची वेळ आली आहे. म्हणून “आता खाजवा की कापूस विकायला डोक” असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही.
शेतकऱ्यांवर ही वेळ का आली हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता परिस्थिती पाहता यंदाचा कापूस हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा निराशा जनक ठरला आहे. कापसाचा हंगाम विजयादशमीला सुरुवात झाला मात्र अगदी सुरुवातीपासून कापूस दर दबावात आहेत. मध्यंतरी कापूस दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत होता. मात्र दरात गेल्या हंगामाप्रमाणे विक्रमी वाढ होईल आणि कापसाला १२०००/०० ते १३०००/०० रुपयांचा भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करण्याऐवजी साठवणूक करण्याचा निर्णय घेतला.
कापूस पिकासाठी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली. आतापर्यंत कापसाच्या चार लाख गाठी विक्रीसाठी बाजारात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यावर्षी आपल्या देशातून केवळ दोन लाख गाठी कापसाची निर्यात झाल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत कापसाला जास्त उठाव नसल्याचे तज्ञ लोक सांगत आहेत.
विशेष बाब म्हणजे देशातील सूतगिरण्यांमध्ये देखील कापसाला मागणी नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामात देशांतर्गत कापूस दर भागात असल्याचे जाणकार लोकांनी सांगितले आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये कापसाला ९५००/०० प्रतिक्विंटल ते १००००/०० हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव मिळत होता. विशेष बाब म्हणजे सरासरी बाजार भाव ९०००/०० प्रतिक्विंटल पर्यंत राज्यातील बहुतांशी बाजारात नमूद करण्यात आला होता.
मात्र डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कापूस बाजारात मोठी मंदी आली. साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर खाली आले, जानेवारी महिन्यात थोडी तेजी पाहायला मिळाली मात्र सद्यस्थितीला पुन्हा एकदा कापूस बाजार भाव साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले आहेत. दरम्यान जाणकार लोकांच्या मते, देशातून कापसाचीं निर्यात वाढवली असती तर दरात तेजी आली असती. मात्र सध्या स्थितीला निर्यात मोठ्या प्रमाणात मंदावली असल्याने दरात अपेक्षित अशी वाढ पाहायला मिळत नाहीये.
दरवाढ पण नाही आणि वजनात पण होतेय घट.
——————————–
दरवाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कापसाची साठवणूक झाली असल्याने कापसात मोठ्या प्रमाणात कीटक तयार झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या घरात असलेल्या सदस्यांच्या अंगावर बारीक पुरळ व खाज येऊन आरोग्यावर अपायकारक परिणाम होत आहेत. एवढेच नाही तर कापसाच्या वजनातही घट होत आहे. शिवाय बाजारात अपेक्षित दर नाही यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी संकटात सापडले असल्याने घरात अंग गाजवण्याची व बाजारपेठेत कापसाला भाव मिळत नसल्याने डोकं खाजवायची वेळ आली आहे.
कापूस दरात घसरण होण्याची प्रमुख कारणे.
—————————-
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजाराचा विचार केला असता भारतीय कापूस महाग आहे. अशा परिस्थितीत भारताऐवजी इतर आयातदार देशांकडून कापसाची आयात सद्यस्थितीला प्रमुख ग्राहक देशात केली जात असून याचाच परिणाम म्हणून भारतातून यंदा प्रथमच कापसाची निर्यात कमी झाली आहे. याशिवाय देशांतर्गत सूतगिरण्यांमध्ये कापसाला मागणी नाही. परिणामी दर दबावात आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात मंदीचे सावट असल्याने सुताला मागणी नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी कापसाला देखील मागणी नसल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय कापूस दरात घसरण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
परंतु तज्ञांच्या मते काही दिवसात दरवाढीसाठी पोषक परिस्थिती.
——————————————
सद्यस्थितीत कापसाला भाव मिळत नसले तरी चीन आणि पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात यावर्षी कापसाची मागणी वाढणार असल्याचा अंदाज आहे. याचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात दरवाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजारात यामुळे तेजी देखील पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसेल आणि दरवाढ होईल असा अंदाज बांधला जात आहे.
याशिवाय जाणकार लोकांच्या मते १३ फेब्रुवारीपासून कापसाचे वायदे पूर्ववत सुरू होणार असल्याने याचा देखील कुठे ना कुठे सकारात्मक परिणाम दरावर दिसेल आणि थोड्याफार प्रमाणात दरात वाढ होईल असा अंदाज आहे. जाणकार लोकांच्या मते ९०००/०० ते ९५००/०० दरम्यान यावर्षी कापसाला दर मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र हा निश्चितच एक अंदाज आहे. दरात वाढ होण्यासाठी पोषक परिस्थिती असली तरी देखील दरवाढ होईलच याबाबत शाश्वती सद्यस्थितीला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या मालाची टप्प्याटप्प्याने विक्री करणे त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार असल्याचे सुचवले आहे.