कुऱ्हाड येथील उमरदे शिवारात बिबट्याने बळी घेतला गाईचा, एखाद्या दिवशी जीव जाईल कुणाच्यातरी आई, बाईचा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील उमरदे धरण परिसरात मागील एक महिन्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. याबाबत पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना वारंवार सांगूनही वनविभागाने अद्यापपर्यंत दखल घेऊन कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे उमरदे शिवारातच काल रात्री बिबट्याने हल्ला उढवत गाईचा फडसा पाडला आहे.
या घटनेत नाईक नगर येथील शेतकरी भीमराव बन्सी चव्हाण यांनी त्यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गाईवर रात्रीच्या वेळेस बिबट्याने हल्ला चढवत जागीच ठार केले. यामुळे या शेतकऱ्याचे सुमारे पंधरा ते वीस हजाराचे आर्थिक नुकसान झालेले आहे. विशेष म्हणजे भीमराव चव्हाण यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यातच बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्यामुळे अजून आर्थिक संकट ओढवल्यामुळे या हतबल झालेल्या चव्हाण कुटुंबीयांना वनविभागाने तत्परतेने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.
*तीन दिवसांपूर्वी या शिवारात आढळला बिबट्या*
तीन दिवसांपूर्वी येथील शेतकरी संतोष चौधरी यांच्या उमरदे धरणाखली असलेल्या शेतात महिला कापूस वेचण्यासाठी जात असताना त्यांना बिबट्या रस्त्यात आडवा झाला, यामुळे महिलांनी एकच हल्लाबोल करून त्याला हाकलले. या बिबट्याचा मुक्त संचार पाहून मजूर धास्तावले असल्याने ते शेतीतील कामे करण्यासाठी जात नसल्याने परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत कारण कापूस वेचणीसाठी तसेच शेतातील इतर कामे करण्यासाठी मजूरवर्ग कामाला येत नाहीत.
*वन विभागाने ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी* .
वन विभागास वारंवार कळविल्यावर देखील वनविभागाने याबद्दल कोणतीही तसदी घेतली नाही .आता तर अनेक पाळीव प्राण्यांच्या बळी जाण्याची वाट वनविभाग बघत नसतील ना ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला.