युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) विषयाला खासदार स्मिता वाघ यांचे सकारात्मक आश्वासन; अमळनेर येथे समितीशी सखोल चर्चा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२५
युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) या महत्त्वाकांक्षी विषयास केंद्र शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) समितीने जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार महोदया स्मिता वाघ (ताईसाहेब) यांची अमळनेर येथे सोमवारी (दि. १ डिसेंबर २०२५) रात्री ८ वाजता त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत सखोल व सकारात्मक चर्चा झाली.
सदर भेटीसाठी कासोदा येथील भाजप पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य श्री. नरेशदादा ठाकरे तसेच खडके येथील भाजप तालुका अध्यक्ष व सरपंच राजूदादा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत ही बैठक घडवून आणणे अवघड असतानाही दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर ही महत्त्वाची बैठक यशस्वी ठरली.
कौटुंबिक कार्यक्रमामुळे राजूदादा पाटील हे प्रत्यक्ष बैठकीस उपस्थित राहू शकले नसले, तरी त्यांनी सातत्याने संपर्क ठेवून बैठक होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) समितीचे पदाधिकारी व नरेशदादा ठाकरे यांनी मिळून खासदार स्मिता वाघ यांची भेट घेत एक सविस्तर निवेदन सादर केले.
या वेळी समितीने युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) विषयाची पार्श्वभूमी, त्याचे सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व, तसेच अपेक्षित परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. खासदार स्मिता वाघ यांनीही विषय गांभीर्याने समजून घेत समितीला विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारले. त्याचबरोबर हा विषय अधिक परिपूर्णपणे मांडण्यासाठी समितीला काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
या सूचनांची पूर्तता झाल्यानंतर समितीची केंद्र शासनाबरोबर थेट बैठक लावण्याचे आश्वासनही खासदार स्मिता वाघ यांनी दिले. त्यामुळे समितीला मोठा दिलासा मिळाला असून हा विषय केंद्र सरकारच्या पातळीवर नेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अत्यंत सकारात्मक, सौहार्दपूर्ण आणि आनंदी वातावरणात ही बैठक पार पडली. या बैठकीच्या निमित्ताने युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) विषयाला ठोस दिशा मिळाल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. समितीच्या या यशस्वी प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत असून, पुढील टप्प्यात केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

