नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला; उच्च न्यायालयाच्या आदेशाने निर्णय, राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२५
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत होणारी मतमोजणी पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून, त्याबाबतचे स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत. मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी होणारी मतमोजणी आता थेट दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पार पडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी दिनांक २ डिसेंबर रोजी मतदान व दिनांक ३ डिसेंबर रोजी मतमोजणी नियोजित होती. मात्र काही नगरपरिषद व नगरपंचायतींविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे, दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रभावित संस्थांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्या कार्यक्रमानुसार मतदान दिनांक २० डिसेंबर आणि मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती.
दरम्यान, रिट याचिका क्र. WP/७५०८/२०२५ या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी स्पष्ट आदेश देत, दिनांक ३ डिसेंबर ऐवजी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजीच मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुधारित आदेश निर्गमित केले आहेत.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, दिनांक २ डिसेंबर रोजी पडलेल्या मतदानानंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. याकरिता आधीच जारी केलेल्या आदेशांनुसार ईव्हीएमची योग्य हाताळणी, सुरक्षित साठवणूक, गोडाऊन व्यवस्थापन अधिकारी नियुक्ती, तसेच सीसीटीव्ही, अलार्म यंत्रणा, अग्निशमन उपकरणे, बॅरेकटिंग व २४ तास सशस्त्र सुरक्षा व्यवस्था अनिवार्य करण्यात आली आहे.
मतदान यंत्र ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनमध्ये केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याची नोंद लॉगबुकमध्ये करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याने मतदानानंतर ईव्हीएमवरील ऑन-ऑफ स्विच अचूकरीत्या बंद असल्याची खात्री निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. मतमोजणीच्या वेळी ‘लो बॅटरी’ असा संदेश आल्यास, पूर्वीच्या आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही करून मतमोजणी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी तसेच उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम साठवणूक गोडाऊनच्या सुरक्षेची पाहणी करता यावी यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उमेदवारांना गोडाऊनचे प्रवेशद्वार दिसेल अशा ठिकाणी बसण्याची सोय करण्याचेही आदेश आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, तसेच नगरपालिका व नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार काटेकोर पालन करून मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, त्याबाबतचा अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे राज्यभरातील निवडणूक निकालासाठी आता दिनांक २१ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रतीक्षा वाढली असून, राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




