शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक : धनशक्तीसमोर जनशक्तीचे मोठे आव्हान; महाविकास आघाडीच्या विजयाचा दांडगा विश्वास.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२५
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीने यंदा केवळ सत्ताबदलाचा प्रश्न न राहता हुकूमशाही विरुद्ध लोकशाही, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा व्यापक अर्थ धारण केला आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महाविकास आघाडी) व अपक्ष उमेदवारांच्या रिंगणामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे.
शेंदुर्णी येथील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांपासून नगरपंचायतीवर महिलांचे राजकारण सुरू असले तरी प्रत्यक्षात महिला नगराध्यक्षांना केवळ कठपुतली बनवून काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मनमानी कारभार केला गेल्याचे गंभीर आरोप सध्या चर्चेत आहेत. या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांसह भाजपातीलच अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
हीच नाराजी उघडपणे व्यक्त करत भाजपचे काही एकनिष्ठ कार्यकर्ते, मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याशी निष्ठा राखत, मात्र स्थानिक नेतृत्वाच्या हुकूमशाहीला कंटाळून निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरले. हा बंडखोरीचा सूर सत्ताधारी पक्षासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
दरम्यान, निवडणुकीतील मतदानावर नाराजीचा परिणाम होणार, याची चाहूल लागताच मते मिळवण्यासाठी देवाणघेवाणीचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे. ‘पाण्यात राहून माशाशी वैर नको’ या भूमिकेतून काही मतदारांनी येणाऱ्या लक्ष्मीचा स्वीकार केला, मात्र मताचा अधिकार वापरताना हुकूमशाहीला छेद देण्यासाठी सरस्वतीला महत्त्व देत मतदान केल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावाला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख निर्माण करून देणारे स्व. गजाननराव गरुड यांच्या संस्कारांची वारसा असलेल्या त्यांच्या कन्या काशीद उज्वलाताई सतीश यांच्या नेतृत्वावर मतदारांनी भरभरून विश्वास टाकत महाविकास आघाडीला निर्णायक साथ दिल्याची जोरदार चर्चा आहे.
विशेष म्हणजे भाजपविरोधात उभे ठाकलेले काही अपक्ष उमेदवारही निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून त्यामुळे सत्ताधारी गटाची गणिते विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्तेचा दुरुपयोग करून जनतेच्या भावनांशी खेळ करणाऱ्यांना यावेळी घरी बसावे लागेल की काय, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी एका बाजूला भाजपचे जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार काशीद उज्वलाताई सतीश यांच्यात सरळ लढत होत आहे. जर या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले, तर तो निकाल केवळ शेंदुर्णीपुरता मर्यादित न राहता मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्यासाठीही राजकीय दृष्ट्या मोठा धक्का मानला जाईल, यात तिळमात्र शंका नाही.
एकूणच, शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक ही धनशक्तीच्या जोरावर सत्ता टिकवण्याचा प्रयत्न आणि जनतेच्या जागृत मतातून परिवर्तन घडवण्याची उमेद यांच्यातील निर्णायक लढत ठरत असून, जनशक्तीचाच विजय होईल असा ठाम विश्वास सध्या व्यक्त केला जात आहे. असे असले तरी सरतेशेवटी मतदान प्रक्रिया ही गुप्त असते म्हणून खरे काय आणी खोटे काय याबाबत सर्व चित्र मतमोजणी नंतरच स्पष्ट होईल.



