‘चलो सेवाग्राम ते नागपूर’ पायी दारूबंदी पदयात्रा; हिवाळी अधिवेशनावर महिला, युवांचा एल्गार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/११/२०२५
महाराष्ट्रात संपूर्ण दारूबंदी आणि गुटखाबंदी झालीच पाहिजे या ठाम मागणीसाठी सेवाग्राम (वर्धा) येथून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर पायी पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा ६ ते ९ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी महिला/युवा मोर्चाच्या प्रमुख मा. सौ. गितांजलीताई कोळी (धुळे) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

पुज्य विनोबा भावे यांच्या सेवाग्राम आश्रमातून आशिर्वाद घेऊन सकाळी १० वाजता या पदयात्रेला सुरुवात होणार असून, महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण असलेल्या नागपूरपर्यंत ही यात्रा चालणार आहे. महिलांचे संसार उद्ध्वस्त करणारी व तरुणाईचे आयुष्य अंधारात लोटणारी दारू व गुटख्याची विक्री थांबवावी, ही या पदयात्रेची मुख्य आणि एकमेव मागणी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या पदयात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला व युवा कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यात धुळे, नंदुरबार, अमरावती, पुणे, अकोला, अहिल्यानगरसह विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सध्या सौ. गितांजलीताई कोळी (धुळे), सौ. उषाताई दावळे (नंदुरबार), सौ. उषाताई कोळी (नंदुरबार), श्रीमती मिराताई बागुल (धुळे), सौ. मनिषा पाटील (धुळे), श्रीमती बेबीताई न्हावी (शहादा), श्रीमती सुलभा ठाकूर (धुळे), सौ. माधुरीताई जुमलेवार (पुणे), सौ. मिराताई कोलटक्के (अमरावती), राहुल सोनवणे (धुळे), भगवान कोळी (नंदुरबार), झंका पाटील (अकोला), रामचंद्र घावट (अकोला), रामा पिचकारे (अहिल्यानगर) यांसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आहे.
दारूबंदी हा केवळ कायद्याचा विषय नसून तो सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. घराघरात हिंसाचार, आर्थिक दुरवस्था, महिलांवरील अत्याचार आणि तरुणाईचे व्यसनाधीनतेकडे होणारे झुकाव याला दारू जबाबदार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे आंदोलन केवळ निषेधात्मक नसून जनजागृतीचेही असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या दारूबंदी पदयात्रेला विरांगणा झलकारीबाई (कोळी) स्त्री शक्ती संस्था, धुळे (नोंदणी क्रमांक महा/१३६८७/धुळे दिनांक १/११/२०१२ व एफ/१२४३५/धुळे दिनांक ५/२/२०१३) यांचे सक्रीय सहकार्य असून, महाराष्ट्रभरातील दारूबंदी समर्थक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.
पदयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समर्थक कार्यकर्त्यांनी आपली नावे नोंदवून स्वेच्छेने प्रती व्यक्ती किमान १०० रुपये आर्थिक मदत करून या जनआंदोलनास पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी सौ. गितांजलीताई कोळी (धुळे) – मोबाईल ९५२७८५०७४२ वर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर निघणारी ही पदयात्रा सरकारचे लक्ष वेधून घेणार असून, महाराष्ट्रात दारूबंदीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
