सत्तेच्या राजकारणात अवैध धंदेवाल्यांची शिरकाव स्पर्धा! भ्रष्ट ठेकेदारांना मिळते राजकीय पाठबळ, सुज्ञ नागरिकांचा इशारा, “हे थांबायलाच हवं!”

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/११/२०२५
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच पाचोरा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी असोत वा विरोधक, दोन्ही गटांतील नेते, आपापल्या पक्षाची बळकटी वाढवण्यासाठी आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या पळवापळवीत गुंतलेले दिसत आहेत. मात्र, या राजकीय गदारोळाचा फायदा घेत काही अवैध धंदे करणारे व भ्रष्ट ठेकेदार आता राजकीय आसरा शोधू लागल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. तसेच बऱ्याच वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी हेही पडद्यामागुन मर्जीतील लोकांची पाठराखण करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सट्टा, पत्ता, जुगार, अवैध दारू निर्मिती व विक्री, धान्याचा काळाबाजार, वाळू व गौण खनिजांची चोरी, अनधिकृत शिक्षण संस्था व शिक्षक भरतीतील गडबड, शासकीय भूखंडावरील तसेच गायरान, गावठाण जमीन घोटाळा, अशा अनेक गैरप्रकारांमध्ये गुंतलेले लोक आता विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यातून त्यांना एकप्रकारे सुरक्षाकवच मिळत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
यातच भ्रष्ट ठेकेदारांना पाठीशी घालणारे आणि अनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयात ठाण मांडून बसलेले काही अधिकारी व कर्मचारी सुरक्षाकवच मिळवून घेण्यासाठी हे देखील आपल्या स्वार्थासाठी पडद्यामागुन राजकारणात सक्रीय झाले आहेत. या ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी गठबंधनामुळे विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, दर्जाहीन बांधकामे आणि निधीचा अपव्यय होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
सुज्ञ नागरिकांनी या सर्व घडामोडींविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “राजकारण हे समाजसेवेसाठी असावं, पण आता काहींच्या हातात ते वैयक्तिक फायद्याचं साधन बनलं आहे. प्रामाणिक, निष्ठावंत आणि समाजाभिमुख लोक राजकारणापासून दूर जात आहेत, हीच खरी शोकांतिका आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, सत्तेच्या राजकारणात काम, दाम, दंड, भेद या नीतींचा वापर करून सत्ता मिळवली जाते, पण नंतर सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले जाते, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. याच राजकीय स्वार्थामुळे समाजात असंतोष वाढत असून, खून, दरोडे, चोरी, वाळू तस्करी आणि अवैध धंद्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अशांतता निर्माण होत आहे.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे अल्पवयीन तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत ओढली जात आहे. “समाजातील अधोगती थांबवायची असेल तर राजकीय नेत्यांनी स्वच्छ राजकारणाचा आदर्श निर्माण करावा आणि अवैध धंदे, भ्रष्टाचार व गुन्हेगारीला राजकीय छत्रछाया देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी,” अशी ठाम मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.



