“एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहिले असते तर आज शेतकऱ्यांचे दिवस पालटले असते”

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/११/२०२५
राज्यातील अनेक भागांमध्ये ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “जर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम राहिले असते, तर शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला असता,” असे मत सध्या ग्रामीण भागातील अनेक शेतकरी खुलेपणाने व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, एकनाथराव शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. पिक विमा, वीज बिल माफी, पाण्याची उपलब्धता, रस्त्यांची कामे, तसेच शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीचे अनेक सडेतोड व जनहिताचे निर्णय त्यांनी घेतले होते. त्यामुळे त्यांच्या काळात प्रशासनावर “शेतकरी हित प्रथम” ही भूमिका स्पष्टपणे दिसत होती. मात्र सध्याच्या सरकारकडून ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळेल का, याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. अनेकांनी आपले शेती खर्च कर्जावर काढले असल्याने त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
“एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करतांना जनतेला केंद्रस्थानी ठेवले. त्यांनी घेतलेले निर्णय वास्तववादी आणि जमिनीवर उतरविणारे होते. आज त्यांच्यासारखा नेता असता, तर शेतकऱ्यांचे दु:ख कमी झाले असते,” असे मत पाचोरा, भडगाव, चोपडा आणि आसपासच्या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सत्यजित न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी. तसेच पिक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई जलद गतीने मिळावी, यासाठी ठोस पावले उचलावीत. अन्यथा सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे.
ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे हे मत राज्यातील कृषी स्थितीचे वास्तव अधोरेखित करते — कारण, शासन यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे सूत्र जपण्याचे कार्य एकनाथराव शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीत यशस्वीरित्या पार पाडले होते, असे ग्रामीण भागातील लोकमान्य मत आहे.

