गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा उपयोग अजिंठा डोंगरातून उगम पावणाऱ्या नद्यांना व्हावा, श्री. अर्जुन भोई.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०५/२०२५
तीसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. कारण जागतिक स्तरावर पाणीटंचाई वाढत आहे, ज्यामुळे भविष्यात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दिवसेंदिवस अनेक देशांमध्ये पाण्याचा पुरवठा कमी होत आहे, तर लोकसंख्या वाढत आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून ही पाण्याची कमतरता राजकीय अस्थिरता निर्माण करू शकते, ज्यामुळे युद्धे होऊ शकतात असे मत काही जज्ञ मंडळींनी व्यक्त केले करत पाण्यासाठी दोन देशांमध्ये किंवा गटांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. व यातुनच पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होऊ शकते असे काही जाणकार तज्ञांचे म्हणणे आहे.

तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेली पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचा योग्य वापर करणे आणि पाणी वाचवणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि पाणी संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नद्या, ओढे, तलाव, विहीरी यांसारख्या जलस्त्रोतांचे संरक्षण करणे आवश्यक असून त्यांना प्रदूषणमुक्त आणि सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याने कालच तापी मधून उत्तर महाराष्ट्राची तृप्ती मेगा पुनर्भरण योजनेवर करार झाला, मागील काळात गुजरात राज्यासोबतचा नार व पार नद्यांच्या पाण्याचा उपयोग नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील तलावात साठवण करून त्याचा उपयोग सदर जिल्ह्यातील शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून केलेला करार आजही आठवणीत आहे.
तसेच जलसंपदा विभागा अंतर्गत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक नाशिक येथे संपन्न होऊन २०२७ साली नियोजित असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आढावा घेतला गेला आहे. आम्ही अपेक्षा करत आहोत की, गोदावरीखोऱ्यातील काही जलस्रोत हा अजिंठा डोंगररांगातून उगम पावणाऱ्या आणि उत्तरवाहीनी असलेल्या नद्यांमध्ये सोडल्यास त्याचा उपयोग या दुष्काळग्रस्त भागातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी निश्चित होईल यात शंका नाही.
अजिंठा डोंगररांगातून उगम पावणाऱ्या व उत्तरवाहीनी असलेल्या नद्यांमध्ये नांदगाव व चाळीसगांव तालुक्यातून वाहणारी मणियार नदी, कन्नडच्या घाटातून चाळीसगाव परिसरात वाहत येणारी नदी, नगरदेवळा परिसरातून वाहत जाणारी नदी, घाटनांद्रा परिसरातून वठाण पुढे पाचोराबाहेरपुरा परिसरातून वाहत पुढे जाणारी नदी, पिंपळगाव हरेश्वरजवळून उगम पावणारी नदी, सोयगाव परिसरातून उगम पावणारी सोनद नदी, अजिंठ्याच्या लेणीजवळून उगम पावणारी वाघुर नदी, तोंडापूर- टाकरखेडा परिसरातून वाहणारी कांगनदी यांच्यामध्ये गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे पुनर्भरण सिल्लोड कन्नड परिसरातून केले तर निश्चितच या दुष्काळग्रस्त भागातील शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि त्यासाठी सदर विभागातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षाही अर्जुनभोई यांनी आमच्या प्रतिनिधीकडे केली.
