रुढी, परंपरेच्या नावाखाली विकृतीचा कळस, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खेळला जातोय जुगार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०४/२०२५
अक्षय तृतीयेला जुगार खेळणे टाळले जाते, कारण हा दिवस शुभ आणि समृद्धीचा मानला जातो. या दिवशी पापी किंवा नकारात्मक कृत्ये करणे, जसे की चोरी, खोटे बोलणे, किंवा जुगार खेळणे, घरातून समृद्धी दूर करतात, असे मानले जाते अक्षय तृतीया हा एक अत्यंत शुभ दिवस आहे, जो नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आणि चांगल्या कामांसाठी योग्य मानला जातो व या दिवशी नकारात्मक कृत्ये करणे टाळले जाते, कारण असे मानले जाते की यामुळे घरातून समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा निघून जाते. असे होऊ नये म्हणून अक्षय तृतीयेला घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी, यासाठी पापी कृत्ये टाळणे महत्त्वाचे आहे. तसेच अक्षय तृतीया ही एक धार्मिक परंपरा आहे, आणि या दिवशी पारंपरिक नियम आणि रूढी पाळल्या जातात. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते, आणि या दिवशी चांगला व्यवहार आणि शुभ कार्ये करणे महत्त्वाचे मानले जाते. बरेचसे लोक दिवशी नवीन व्यवसाय, खरेदी, किंवा इतर शुभ कार्ये सुरू करणे चांगले मानले जाते. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते कारण असे केल्याने घरात समृद्धी येते.
परंतु याच दिवशी काही विकृत स्वरूपाचे लोक अक्षयतृतीया आली म्हणजे जुगार खेळतांना दिसून येते आहेत. याबाबत या जुगाऱ्यांशी चर्चा केली असता ते सांगतात की हे आधिपासूनच चालत आले आहे व सतत चालुच रहाणार आहे. म्हणून आम्ही हा जुगार खेळत आहोत. परंतु हा जुगार खेळतांना जुगारी लोक एका बाजूला घरातील धनधान्य, महिलांच्या अंगावरील दागदागिने, स्वताजवळ असलेल्या दुचाकी, चारचाकी वाहने व घर, शेतीवाडी गहाण ठेवून किंवा याची विक्री करुन पैसे डबल होतील या आशेवर खेड्यापाड्यातील गल्लीबोळात, शहरात बिनधास्तपणे
जुगार खेळतांना या जुगाराच्या खेळत कित्येक लोक हजारो नव्हे तर लाखो रुपये गमावत असल्याने हातचा पैसे व आहे ती स्थावर व जंगम मालमत्तेची राखरांगोळी झाल्यामुळे आत्महत्या करतात. यामुळे बरीचशी कुटुंबे दरवर्षी बर्बाद होत असल्याचे दिसून येते मात्र तरीही आपणं ह्या रुढी, परंपरेच्या नावाखाली खोटा आव आणून असे प्रकार करत आहोत.
******************************************************
कायद्याच्या रक्षकांच्या तोंडी परवानगीने शहरात व गावागावात जुगाराचे अड्डे.
******************************************************
याचाच फायदा घेत काही चतुर लोकांनी आपल्या सोयीनुसार ठिकठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था करुन त्याठिकाणी कुलर, पंखे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य सोबतच भुक लागल्यास फराळ, जेवण, थंड पाणी याची व्यवस्था केली असून या सुविधा पुरविण्यासाठी मनमानी पैसे वसूल करत आहेत. विशेष म्हणजे या सुविधा देतांना जुगाराच्या अड्ड्यांचे मालक येथेच थांबलेले नाहीत तर याच ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या प्रकारची दारु, जुगार खेळण्यासाठी पैशांची गरज भासल्यास जुगार खेळण्यासाठी आलेल्या जुगारींची दुचाकी, चारचाकी वाहने, दागदागिने किंवा हवाल्याने लाखो रुपये देऊन हजारो रुपयांचे व्याजाची कमाई करत आहेत.
शहरासह जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील गल्लीबोळात, शेतात, जंगलात सुरु असलेल्या मोठमोठे जुगाराचे अड्डे पाहून अधिक माहिती जाणून घेतली असता काही अड्डे वाल्यांनी व काही सुज्ञ नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की आम्ही आमच्या परिसरातील पोलीसांना भेटून अक्षयतृतीया सणानिमित्त जुगाराचे अड्डे सुरु करण्यासाठी ठराविक रक्कम देऊन त्यांची मुक संमती मिळवून घेतली असल्याचे सांगितले.
******************************************************
दरोडेखोराकडून बचावासाठी जागरण करतांना खेळायचे विविध खेळ.
*******************************************************
आधीच्या काळात दरोडेखोरांच्या टोळ्या होत्या ते अक्षयतृतीया सणानिमित्त मुद्दामहून दरोडा टाकून आपल्या लुटमारीचा शुभारंभ करायचे कारण साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षयतृतीया हा दिवस महत्वाचा मानला जातो. तसेच आधीच्या काळात बॅंका नव्हत्या व शेतकरी कुटुंबाजवळ शेतमाल विकुन आलेला पैसा, पुढील वर्षासाठी लागणारा पैसा, महिलांचे दागदागिने हे सगळ धन घरातच सांभाळावे लागत होते. व दरोडेखोराकडून अक्षयतृतीयेच्या दिवस लुटमार होण्याची शक्यता असल्याने गावातील व वाड्यावस्त्यांतील लोक गावाच्या सुरक्षेसाठी गावाच्या चावडीवर, मुख्य रस्त्यावर रात्रभर जागरण करुन गावाचे रक्षण करत होते.
हे जागरण करतांना झोप येऊ नये म्हणून पुरुष वर्ग करमणुकीचे साधन म्हणून त्याकाळी सारीपाट, कवड्यांचा व इतर खेळ खेळत व महिला यांना साथ देण्यासाठी तसेच उकाड्यापासून सुटका करुन घेण्यासाठी झाडाला झोके बांधून झोक्यावर बसून आपली पारंपरिक गाणी म्हणून जागरण करत असत यामुळे दरोडेखोराकडून लुटमार होण्याची शक्यता कमी असायची परंतु आपण आता याचाच गैरफायदा घेत जुगार खेळण्यासाठी संसार उद्धवस्त करत आहोत हे मात्र निश्चित.