विनयभंग व अॅट्रॉसिटी गुन्ह्यांचा वाढता आलेख, सामाजिक अशांतता पसरण्याची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०५/२०२५
सद्यस्थितीत सामाजिक व राजकीय क्षेत्रात कमालीचा बदल होतांना दिसून येत असल्याने प्रत्येकाची नव्हे परंतु समाजातील काही घटकांची मानसिकता झपाट्याने बदलत चालली असल्याचे दिसून येत आहे. यामागील कारण म्हणजे दिवसेंदिवस वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, एकमेकांच्या चढाओढीत हेवेदावे, मानसन्मान, प्रतिष्ठा, पैसा हाच परमेश्वर समजून पैसा कमावण्यासाठी काहीही करण्याची बदलती मानसिकता व सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजकीय क्षेत्रात आपापले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व ते टिकवून ठेवण्यासाठी सर्वसामान्य, गरजू, सर्वसामान्य जनतेच्या अजाणतेचा फायदा घेत वेगवेगळे अमिष दाखवून त्याचा वापर करुन एकमेकांचे पाय ओढण्याची जणू स्पर्धाच लागली असल्याचे सगळीकडे दिसून येते आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व एकमेकांच्या मतभेदांमुळे वचपा काढण्यासाठी सद्यस्थितीत विनयभंग व अॅट्रॉसिटी सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता छोट्या, छोट्या वैयक्तिक किंवा इतर कोणत्याही कारणाने आपसात मतभेद, शाब्दिक चकमक किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे भांडणतंटे झाल्यावर एकमेकांना अडकवण्यासाठी विनयभंग व अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करुन समोरच्याला जेरबंद करण्यासाठी खेळी खेळली जात असल्याचे मत काही सुज्ञ नागरिक व समाजसेवकांनी प्रसारमाध्यमे व्यक्त केले आहे. सुज्ञ नागरिकांच्या मते विनयभंग व अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे आजही घडत आहेत याबद्दल आमचे दुमत नाही परंतु या गुन्ह्यातील सत्यता पडताळून पाहिली असता विनयभंग किंवा अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करण्यात येत असले तरी दहापैकी आठ गुन्हे खोट्या पध्दतीने दाखल करुन कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याने या गुन्ह्याचा वाढता आलेख लक्षात घेता सामाजिक अशांतता पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत सुज्ञ नागरिक व समाजसुधारकांनी व्यक्त करत असे गुन्हे दाखल करुन घेण्यासाठी व गुन्हा दाखल करण्याआधी सत्यता पडताळून घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले आहे.
कारण मागील दोन महिन्यांपूर्वी अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील एका सट्टा (मटका) किंगने त्याच्याच गावातील इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला मुलगा अवैध धंदे करण्यासाठी विरोध करतो म्हणून घरातील महिलेचा वापर करुन त्यांच्याविरुद्ध पोस्को सारखा गंभीर गुन्हा दाखल केला होता. यामुळे त्या मुलाला ऐनवेळी अटक करण्यात आल्याने त्याला इयत्ता बारावीच्या परिक्षेत बसता आले नाही. तसेच गावागावात, गल्लीबोळात अवैध धंदे व राजकीय व्देषापोटी असे गुन्हे दाखल केले जात असल्याने अशा बऱ्याचशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्याने असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करुन घेतांना सखोल चौकशी करुनच गुन्हा दाखल झाला पाहिजे असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.